सोनिया अन् राहुल गांधींची घेतली भेट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झारखंडमध्ये ‘ऑपरेशन कमळ’ आणि काँग्रेस-झामुमोचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची टिप्पणी केली आहे. सोरेन यांनी सोमवरी दिल्लीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सरकारवर कुठल्याही प्रकारचे संकट नाही, झामुमो-काँग्रेस-राजद सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा सोरेन यांनी या भेटीनंतर केला आहे. याचबरोबर त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीमध्ये सोमवारी राज्य काँग्रेस प्रभारी आरपीएन सिंग आणि राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी चर्चा केली आहे. झामुको आणि काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात नसल्याचा दावा सोरेन यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
आघाडी सरकार चालवताना घटक पक्षाचे आमदार स्वतःच्या मागण्या तसेच भूमिका मांडत असतात, याकडे नाराजी म्हणून पाहिले जाऊ नये. सर्वांना स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार असून सरकार त्यांच्या सूचना अंमलात आणत आहे. निवडणुकीवेळी आघाडी सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते आरपीएन सिंग यांनी म्हटले आहे.