आगरतळय़ातील प्रचारसभेत पंतप्रधानांनी व्यक्त केली भीती
आगरतळा / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्रिपुरातील आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत काँग्रेस-डावे त्रिपुराचा नाश करतील, अशी भीती व्यक्त करतानाच त्रिपुरामध्ये पूर्ण बहुमत असलेले भाजपचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले. त्रिपुरातील जनतेने पुन्हा एकदा भाजपचे सरकार बनवण्याचा निर्णय घेतल्याचे आता याठिकाणी माझ्यासमोर असलेल्या गर्दीतून दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आम्ही त्रिपुरामध्ये शांतता आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित केले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्षांचे झेंडे दिसतात, पूर्वीच्या काळात एकच पक्ष असायचा, यावरून हे स्पष्ट होते. डबल इंजिन सरकारला तुमचा पाठिंबा पाहून माझाही आनंद द्विगुणित झाला. त्रिपुरातील जनता विकास पाहत असल्याने आज वातावरण भाजपच्या बाजूने आहे. त्यांना सर्वांच्या पाठिंब्याचे आणि विकासाचे सरकार हवे आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला भाजपकडून साथ मिळत असल्याने ते आज विकासाच्या बाजूने उभे राहिल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
मोदींचा झंझावाती दौरा
सोमवारी सकाळी पंतप्रधानांनी बेंगळूरमध्ये एअरो इंडिया शो 2023 चे उद्घाटन केले. तेथून ते थेट त्रिपुराला पोहोचले. यानंतर, 3,350 किमीहून अधिक अंतर कापून ते दिल्लीला परतले. यापूर्वी शनिवारीही पंतप्रधानांनी त्रिपुराचा दौरा केला होता. गेल्या तीन दिवसात पंतप्रधानांनी 10 सार्वजनिक सभांना संबोधित करण्यासाठी आणि अनेक विकास उपक्रम सुरू करण्यासाठी 10,800 किमीपेक्षा जास्त प्रवास केला आहे.