पी. चिदंबरम यांनी दिली माहिती
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास त्यात जनता हाच केंद्र बिंदू ठेवला जाणार आहे. जनतेच्या सहभागानेच सरकार चालविले जाईल. दर दोन वर्षांनी जनतेला विश्वासात घेऊन जनतेला काय हवेय हे जाणून घेऊन, त्या मार्गाने सरकार पुढे जाईल अशी माहिती काँग्रेसचे गोवा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम यांनी काल गुरूवारी मडगावात बोलताना दिली.
मडगावात काल काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा तयार करण्यासाठी थेट जनतेकडे संवाद साधला. जनतेच्या मागणी प्रमाणेच जाहीरनामा तयार करण्यावर काँग्रेस पक्षाने भर दिला असून काल सुमारे 200 लोकांनी आपली उपस्थिती लावली होती. त्यात जनतेने वाढती बेरोजगारी, लघु उद्योग, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, रस्ते, पाणी, वीज, मच्छीमारी, गोव्यात कोळसा नको, नद्याचे खासगीकरण, कृषी, आरोग्य, पर्यटन, पंचायती राज, महिलांसाठीचे आरक्षण, हॉटेल व्यवसाय इत्यादी विषय मांडले व त्यांचा जाहीरनाम्यात समावेश करावा अशी सूचना केली.
यावेळी मार्गदर्शन करताना पी चिदंबरम म्हणाले की, सरकार विकासाभिमूख होण्यासाठी जनतेचा सहभाग खुपच महत्वाचा असतो. जनतेच्या सहभागाशिवाय सरकार योग्य निर्णय घेऊ शकत नाही. जनतेच्या सहभागानेच सरकार यशस्वी कामगिरी करू शकते. त्यामुळे गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानतंर जनतेच्या इच्छेनुसारच सरकार चालविण्यात येईल.
जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्याकडे देण्यात आली असून त्यांना माजी सरकारी अधिकारी एल्विस गोम्स हे सहकार्य करीत आहेत. काल त्यांची उपस्थिती होती. त्याच बरोबर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक व कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा उपस्थित होते.
नद्याचे खासगीकरण रद्द करा
काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात भाजप सरकारने गोव्यातील सहा नदय़ाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करावा. या नदय़ावर गोव्यातील असंख्य लोकांची उपजीविका चालते. त्याच बरोबर नदय़ातील गाळ उपसल्यास नदीचे किनारे कोसळून जाऊन समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे खासगीकरण रद्द व्हायला पाहिजे.
सरकारने सामान्य जनतेसाठी योजना बनविताना, त्या योजना सहजरित्या उपलब्ध होतील. त्यासाठी सरकारी कचेऱयांनी हेलपाटे घालावे लागणार नाही. गोव्यातील कुळ-मूडकाराचा प्रश्न लवकर निकाली काढण्याची हमी काँग्रेसने जनतेला द्यावी, अनुसूचित जाती-जमातीच्या मागण्या लवकर सोडविण्यास प्राधान्य द्यावे तसा उल्लेख जाहीरनाम्यात करण्याची मागणी रामकृष्ण जल्मी यांनी केली.
लघु उद्योगला प्राधान्य हवे
आज बेरोजगारीची समस्या गंभीर बनलेली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लघु उद्योगाला प्राधान्य द्यावे, जेणे करून गोव्याची आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल, त्याच बरोबर बेरोजगारीची समस्या सुटण्यास मदत होईल असे रॉयला फर्नांडिस म्हणाल्या. स्वच्छ पाण्याचा अखंडित पुरवठा, चांगले रस्ते, दर्जात्मक वीज पुरवठा, इत्यादी साधन सुविधांना काँग्रेसने प्राधान्य दय़ावे. मोफत देऊन कर दात्यांवर भर टाकू नये असा प्रस्ताव देखील पुढे आला.