येत्या आठवडय़ात काँग्रेसचा नवीन अध्यक्ष होईल. नरसिंह राव यांच्यानंतर जवळजवळ तीन दशकांनी दक्षिणेतील अध्यक्ष काँग्रेसला मिळेल. मल्लिकार्जुन खर्गे निवडून आले काय अथवा शशी थरूर, दोघेही दक्षिणेतीलच आहेत. पण पुढील अध्यक्ष खर्गेच असतील असे स्पष्ट दिसत आहे. गांधी-नेहरू परिवाराचा त्यांच्यावर हात आहे. ‘नाही, नाही’ असे कितीही याबाबत म्हणले जात असले तरी जातीच्या काँग्रेसीला ‘त म्हटले की ताकभात’ लागलीच कळतो. त्यांना सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांचा वरदहस्त कोणावर आहे ते सांगावे लागत नाही.
‘गांधी परिवार सर्वांबरोबरच आहे. त्याचा कोणी उमेदवार नाही’ असे म्हणणे थरूर यांनादेखील फायदेशीर आहे. जेव्हढे पदरी पडेल तेवढे पाडून घेतले की उद्या कोणीही काँग्रेस अध्यक्ष झाला तरी आपल्याला विसरू शकत नाही असा थरूर यांचा सिधासाधा हिशोब दिसत आहे. संयुक्त राष्ट्रसंघात उच्चपदी राहिल्याने आणि गेली 10 वर्षे केरळसारख्या राजकीय दृष्टय़ा जागृत राज्यातून खासदार राहिल्याने राजकारणातील छक्के पंजे ते चांगले शिकले आहेत. त्याचाच परिणाम ही त्यांची उमेदवारी आहे. या निवडणुकीत खर्गे यांना झुकते माप दिले जात आहे, ही त्यांनी केलेली तक्रार फारशी चुकीची नाही.
निकाल काहीही लागो पण या निवडणुकीने काँग्रेस जीवंत आहे हा संदेश गेला आहे आणि भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाने तो द्विगुणित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. त्याच्याशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसला अजून बरेच बळ लागणार आहे. आत्ताशी कुठे काँग्रेसमध्ये थोडी धुगधुगी आली आहे. भाजप त्यामुळे जरा जास्तच सावध झाली आहे हेदेखील तितकेच खरे.
नवीन काँग्रेस अध्यक्षाला भाजपच्या रणनीतीची मेख कळली आणि तिला छेद कसा द्यायचा हे समजले तर चक्रव्यूह भेदल्यासारखे होणार आहे. पण त्याअगोदर त्याला पक्षातील चक्रव्यूह भेदावा लागेल. काँग्रेस अंतर्गतच एकमेकांचा काटा काढायला निघालेले गट विविध स्तरांवर पसरले असल्याने सर्व गटातटांची दिलजमाई घडवून आणून एकीची वज्रमूठ ते दाखवू शकतील काय हा लाखमोलाचा प्रश्न आहे. येत्या सतरा महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीसह 13 निवडणुका आहेत. पुढील दोन महिन्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशची निवडणूक आहे. हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीची घोषणा झाली असून निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. येत्या चार ते सहा महिन्यात जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश बनवल्यानानंतरची पहिलीच निवडणूक आहे. तर पुढील वर्ष व 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नऊ राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा यांचा समावेश आहे. तात्पर्य काय 80 वर्षाच्या खर्गे साहेबांना एक मिनिटाची उसंत मिळणार नाही आहे. या वयात त्यांच्यात सुपरमॅनचा संचार होईल अशी अपेक्षा करणे वेडेपणाचे आहे.
पण सामान्य काँग्रेसीचे एक अजब तंत्र असते. सत्ता येण्याची त्याला अंधुकशी जरी चाहूल लागली तरी तो पायाला भिंगरी लावल्यासारखा कामाला लागतो. आपापसातील मतभेद मिटवून सत्ता कशी वाटावयाची याचे गणित आखतो. 2014 पासून सत्तेत असल्याने भाजपला दहा वर्षाच्या अँटी-इन्कमबंसीचा सामना करावयाचा आहे ही विरोधी पक्षांकरता एक जमेची बाजू आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे भाजपचे हिंदुत्वाचे नाणे खणखणीत ठेवण्यासाठी जी मेहनत घेत आहेत ती सत्तेची खुंटी घट्ट करण्यासाठी. मोदी विरुद्ध कोण? हा प्रश्न भाजपकडून वारंवार विचारला जात आहे त्याचा अर्थ त्यांना पुढील लोकसभा निवडणूकदेखील अमेरिकन पद्धतीप्रमाणे अध्यक्षीय करायची आहे.
खर्गे आणि थरूर हे दोघेही एकप्रकारे काँग्रेसचे चेहेरेच आहेत. खर्गे म्हणजे जुनेजाणते. नेहरूंचे मोठेपण बघत इंदिरा गांधींच्या काळापासून पक्षात सक्रिय असलेले. कर्नाटक ही मुख्यतः त्यांची कर्मभूमी. तीनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलेले. पण दलिताला असे टक्केटोणपे खात राहावे लागणार याची जाण असलेले. नि÷ावंत पण महत्वाकांक्षीदेखील. पण गुलाम नबी आझाद यांच्या धाटणीतील अजिबात नाही. त्यामुळेच पक्षाचा पडता काळ सुरु झाला आणि राष्ट्रीय पातळीवर दुर्लक्षित झालेले खर्गे हे वर चढत गेले ते आता पक्षाध्यक्ष होण्याच्या उंबरठय़ावर आहेत.
थरूर जर निवडून आले तर तो चमत्कारच मानावा लागेल. पण थरूर यांनी या निवडणुकीत प्रवेश केला आणि ते तिथे टिकून राहिले यामुळे काँग्रेसचा जबर फायदा झाला आहे. पक्षातील एका गटाला त्यांचे असे हे लढणे आवडले नाही हे खरे असले तरी सर्व संघटनेमध्ये त्यांच्याविषयी आत्मियता वाढली आहे. बहुभाषी असलेले थरूर इंग्लिशमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक प्रभावी वक्ता आहेत. समाज माध्यमांवर त्यांचे कोटय़वधी फालोअर्स आहेत. त्यांची एक वेगळीच पेझ शहरी मध्यमवर्गात व महिलांमध्ये आहे. तरुणवर्गाला त्यांच्याविषयी अप्रूप आहे. भारतीय राजकारणात त्यांच्याइतका चतुरस्त्र वक्ता आणि बुद्धिवंत विरळाच.
गांधी घराण्याच्या नि÷ावंतांना आवडो अथवा नावडो, नवीन अध्यक्ष हा पक्षातील अजून एक सत्ता केंद्र होणार आहे. एकदा सत्ता मिळाली की माणसे थोडी बदलतात. त्यांना आपणदेखील कोणीतरी आहोत असे वाटू लागते. त्यामुळे ती कोणाची फार काळ रबर स्टॅम्प राहू शकत नाहीत. त्यांना रबर स्टॅम्प राहू न देण्यासाठी संघटनेतील एक गट नेहमी कार्यशील असतो. खर्गे यांचे वय झालेले असल्याने ते स्वतः सगळय़ा गोष्टी करणे अशक्मय आहे. त्यांना त्यांचा एखादा ‘अहमद पटेल’ अथवा ‘के सी वेणुगोपाल’ नेमावा लागेल. नरसिंह राव एव्हढा विद्वान आणि चतुर नेता. सीताराम केसरी आपल्या आज्ञेत राहील अशा समजाने त्यांनी त्याला अध्यक्ष बनवला. केसरीचाचांनी सत्ता मिळाल्या क्षणापासून राव साहेबांना काटणे सुरु केले. ज्या नरसिंह राव यांना सोनिया गांधींनी ताकद दिली त्यांनी या घराण्यालाच खिळखिळे करण्याचे राजकारण केले हे ही सर्वश्रुत आहे. काँग्रेसचे डबके झाल्यानेच त्याच्या ऱहासाला सुरुवात झाली हे देखील तेव्हढेच खरे.
सांगण्याचे तात्पर्य हे की नवीन काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीनंतर संघटना हळूहळू बदलू लागणार आहे. निर्णयप्रकिया केवळ राहुल आणि प्रियंकाच्या मर्जीनुसार होणार नसल्याने पंजाबमध्ये पक्षाचे पानिपत झाले तसे प्रकार होणार नाहीत. नवज्योतसिंग सिद्धूसारखे भंपक लोक अधिकारावर येणे कमी होईल. पक्षाला परत सक्रिय करावयाचे असेल तर महाराष्ट्रासह बऱयाच राज्यात संघटनेत मोठे फेरबदल करावे लागतील. पक्षातील नॉमिनेशन कल्चरला बऱयाच प्रमाणात मूठमाती दिल्याशिवाय हे शक्मय नाही. आपल्या प्रचार मोहिमेत थरूर यांनी नॉमिनेशन कल्चरचा मोठा मुद्दा बनवला आहे ते त्यामुळेच स्वागतार्ह आहे.काँग्रेस जेव्हढी लोकाभिमुख होईल तितके तिचे भले होणार आहे. काँग्रेस एकसंध दिसल्यावरच/झाल्यावरच विरोधी ऐक्मयाचे चित्र कसे राहणार हे स्पष्ट होणार आहे. प्रादेशिक पक्षांना आपापल्या प्रभाव क्षेत्रात काँग्रेसने फिरकू नये असे वाटत असले तरी तसे होणार नाही. काँग्रेस म्हणजे एक हत्ती आहे आणि तो आता जागा झाला आहे असा दावा त्याचे काही नेते करू लागले आहेत. त्यात कितपत तथ्य आहे ते येत्या डिसेंबरमध्ये गुजरात आणि त्याअगोदर हिमाचलच्या निवडणुकीत दिसणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेस गुप्तपणे प्रचाराला लागली आहे सावध राहा, असे साक्षात पंतप्रधानांनीच सांगितले आहे. त्यात किती तथ्य ते लवकरच दिसणार आहे. या निवडणूका नवीन काँग्रेस अध्यक्षाची पहिली कसोटी राहणार आहे.