पाच राज्यातील निकालांचा आढावा घेणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात ही बैठक होणार आहे. पाच राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत काँग्रेस नेते राज्यांमधील पराभवावर विचारमंथन करून पुढील राजकारणाची दिशाही ठरविली जाऊ शकते. तसेच नाराज नेत्यांकडून पक्षनेतृत्त्व बदलण्याची मागणीही बैठकीत होऊ शकते.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी ज्यापद्धतीने जाहीर सभा घेतल्या, त्यानुसार काँग्रेस जास्त जागा जिंकेल, असे वाटत होते. मात्र, देशातील सर्वात जुन्या पक्षावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. पक्षनेतृत्वालाही याची चिंता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर पक्षाने आता काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यसमितीची बैठक रविवारी दुपारी 4 वाजता दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयात होणार असल्याची माहिती पक्षाकडून शनिवारी देण्यात आली. बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खराब कामगिरी, पराभवाची कारणे आणि पक्षाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला यावेळी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एवढेच नाही तर पंजाबची सत्ताही हातातून गेली. यानंतर सातत्याने पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
असंतुष्ट नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, पंजाबसह इतर राज्यातील पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट मंडळी सक्रिय झाली असून शुक्रवारी गुलाम नबी आझाद यांच्या घरी बैठक झाल्याचे समजते. या बैठकीला मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांचाही सहभाग होता. बैठकीत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसची तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्ष नेमण्यासंबंधी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.