भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची टीका
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कोळसा प्रकरण व रेल्वे डबल ट्रेकिंग प्रकल्प ही काँग्रेसची अपत्ये आहेत. आता विरोध करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. त्यांच्या नेत्यांच्या तोंडालाच कोळसा फासण्याची वेळ आता आली आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्याना जनतेचे भले करण्याची इच्छा नाही ते केवळ प्रसिध्दीसाठी हपापलेले आहेत. कुठेही काहीही सुरु झाले की तिथे जाऊन आपला झेंडा हलवण्याचा ते प्रयत्न करीत असतात, असेही तानावडे म्हणाले.
गुरुवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत अनिल होबळे, दामू नाईक उपस्थित होते.
सार्दिन, कामत आता कसला विरोध करतात?
आज राज्यात ज्या रेल्वे डबल ट्रेकिंगला विरोध होत आहे. तो प्रकल्प खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीच गोव्यात आणला होता. तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सार्दिन यांचे विधानसभेत अभिनंदनही केले होते. मग आता विरोध कशाला करता, असा प्रश्न तानावडे यांनी उपस्थि केला आहे.
भाजप व मोदींवर देशभरातील जनतेचा विश्वास
भाजपा जनतेसाठी जनतेमध्ये मिसळून काम करीत आहे म्हणून बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तसेच देशभरात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने चांगले यश प्राप्त केले आहे. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीवर लोकांचा पूर्ण विश्वास आहे. देशात एकूण 57 ठिकाणी निवडणुका झाल्या. त्यातील 40 ठिकाणी भाजपाने विजय मिळविला आहे तर काँग्रेसने केवळ 11 ठिकाणी विजय प्राप्त केला आहे, असेही तानावडे म्हणाले.
कार्यालयात बसून आणि इतरांनी सुरु केलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या पक्षाचा झेंडा उचांवला म्हणून जनता पाठीशी राहत नाही. त्यासाठी जनतेमध्ये मिसळून जनतेसाठी कार्य करणे जरूरीचे आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते केवळ प्रसिध्द मिळविण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे. भाजप सरकार करीत असलेल्या विकासकामात अपशकून बनण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणीतरी कुठल्या विषयावर आंदोलन करतात काय वाट पाहत असतात नंतर काँग्रेसचे मोजकेच कार्यकर्ते त्या आंदोलनात जाऊन आपला झेंडा फडकावण्याचा प्रयत्न करतात. वर्तमानपत्रात फोटो आणि बातम्या प्रसिध्द व्हाव्यात इतकाच त्यांचा हेतू असतो, असेही तानावडे म्हणाले.
आपचे नेते केजरीवाल यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की केजरीवाल हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर ते केवळ दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अगोदर दिल्लीत काय होत आहे ते पहावे. आज दिल्लीची स्थिती काय आहे हे दिल्लीत गेलेल्यांना माहिती आहे. केजरीवाल गोव्यातील प्रदूषणाबद्दल बोलतात, मात्र दिल्लीत कोविड 19 प्रकरण कुठे पोचले? याच्यावर त्यांचे लक्षच नाही, असेही तानावडे म्हणाले.