वेलसांव किनाऱयावरील संवादात राहुल गांधी यांचे मच्छीमार समुहाला आश्वासन
प्रतिनिधी/ वास्का
गोव्यातील मच्छीमार, मजूर आणि कमकुवत वर्गाचे हितरक्षण करण्यास काँग्रेस पक्ष वाचनबध्द असून गोवा कोळसा केंद्र कदापी होणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणाची पूर्ण दक्षता काँग्रेस पक्ष घेणार आहे. गोमंतकीया प्रमाणेच मलाही आणि देशातील लाखो लोकांना गोव्याचे नैसर्गीक सौदर्य प्रीय आहे. ते राखून ठेवण्यासाठी गोव्यातील पर्यावरण नष्ट होऊ देणार नाही असे स्पष्ट आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी दक्षिण गोव्यातील वेलसाव समुद्र किनाऱयावर उपस्थित जनसमुहाला दिले. तसेच काँग्रेसच्या निवडणुक जाहीरनाम्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
काल शनिवारी सकाळी राहुल गांधी यांचे गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर त्यांचे काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी मुरगाव तालुक्यातील वेलसाव गावच्या दांडो समुद्रकिनाऱयावर जमलेल्या मच्छीमार बांधवाची भेट घेतली. वेलसांव किनाऱयावर काँग्रेस पक्षाने शामियाना उभारून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खासदार राहुल गांधी आणि उपस्थित मच्छीमार समुहामध्ये या कार्यक्रमात थेट संवाद झाला. मच्छीमार, रेंदेर व इतर संबंधीत घटकांनी राहुल गांधी यांच्यासमोर मच्छीमारी व्यवसायासंबंधीचे प्रश्न, इंधनाच्या महागाईचा प्रश्न आणि पर्यावरणासंबंधीचे प्रश्न मांडले. राहुल गांधी यांनी त्यांची गाऱहाणी गांभीर्याने ऐकून घेऊन आपण या समस्यां सोडवण्यासाठी बांधील असल्याचे उपस्थित समुहाला सांगितले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय नेते पी. चिदंबरम, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलॅक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रभारी दिने गुंडूराव, प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर, माजीमंत्री आलॅक्स सिकेरा व मान्यवर उपस्थित होते.
मच्छीमारांनी व्यवसायीक समस्या मांडून पर्यावरणाच्या रक्षणाचीही केली मागणी
खासदार राहुल गांधी यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच, उपस्थित मच्छीमार समुहाने त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी राहुल गांधी उपस्थित समुहामध्येचे येऊन थांबले व त्यांनी मच्छीमारांचे प्रश्न ऐकण्यास सुरवात केली. गोंयच्या रापणकारांचो एकवोटचे नेते आग्नॅल रॉड्रिक्स यांनी रापणकारांच्या समस्या मांडल्या. यासंबंधीचे एक निवेदनही त्यांनी राहुल गांधी यांना सादर केले. बेकायदेशीर मासेमारीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला व सरकारकडून कारवाई होत नसल्याचे सांगितले. रापणकारांवर होणारा अन्याय त्यांनी मांडला. काही मच्छीमारांनी सीआरझेडचा विषय मांडला. किनाऱयावर हॉटेल्सची बांधकामे होतात आणि सर्वसामान्य मच्छीमारांना मात्र अटकाव होतो. गोव्याबाहेरील मच्छीमारांचा शिरकाव येथील समुद्रात होतो. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना त्रास होतो. इंधनाचे दर भडकलेले आहेत. त्यामुळे मासेमारीचा खर्च परवडत नाही. इंधनावर देण्यात येणारे अनुदान वाढवण्याचे सोडून ते कमी करण्यात येत आहे अशा तक्रारीही मच्छीमारांनी मांडल्या. रेदेंर समुहातील प्रतिनिधीही यावेळी प्रश्न मांडले. पूर्वीपासून असलेल्या रेलमार्गामुळे होणारा त्रास आणि दुपदरीकरणामुळे होऊ घातलेल्या त्रासाकडे काहींनी लक्ष वेधले. रेल मार्गामुळे इथली जमीन आणि पर्यावरणाची हानी होणार आहे. या प्रश्नात लक्षात घालण्याची मागणी काहींनी केली. रेलमार्गावरून होणारी कोळशाची वाहतुक व त्याचे दुष्परीणाम याविषयीही तक्रारी मांडण्यात आल्या. किनारी भागात होणाऱया हॉटेल्स प्रकल्पामुळे जल प्रदुषण आणि होणार इतर पर्यावरणीय परीणामांची माहितीही यावेळी मच्छीमारांनी दिली व हॉटेल प्रकल्प गावात होऊ नयेत अशी मागणी केली. वास्को व झुआरीनगरातील मासे विक्रेत्यांनीही आपल्या समस्यां राहुल गांधींसमोर मांडल्या.
गोमंतकीय व माझ्याप्रमाणेच देशातील लाखो लोकांना गोव्याचे निसर्ग सौंदर्य प्रिय
मच्छमार समुहाने मांडलेल्या प्रश्नांवर बोलताना राहुल गांधी यांनी स्थानिक मच्छीमार, मजूर आणि समाजातील कमकुवत घटकांच्या हिताचे रक्षण करण्यास काँग्रेस पक्ष वचनबध्द असल्याचे स्पष्ट केले. गोव्याच्या पर्यावरणाचे रक्षण व्हायलाच हवे. माझे कुटुंबसुध्दा विश्रांतीसाठी याच किनाऱयाचा आश्रय घेत असते. गोमंतकीयाप्रमाणेच देशातील लाखो लोकांना गोव्याचे निसर्ग सौदर्य अबाधीत राहिलेले हवे आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबध्द राहील असे गांधी म्हणाले. गोवा कोळसा केंद्र कदापी होऊ देणार नाही. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा येणार असून या जाहीरनाम्यात लोकांच्या अपेक्षांना स्थान देण्यात येणार आहे. हा जाहीरनामा पारदर्शी असणार आहे. लोकांशी चर्चा करून तयार करण्यात येणार आहे. जाहीरनाम्याच्या निर्मितीमध्ये स्थानिक लोकांनीही सहभागी व्हावे. आपल्या ईच्छा अपेक्षा व्यक्त कराव्यात. काँग्रेस पक्ष जाहीनाम्यातील प्रत्येक वचनाचे पालन करील. प्रत्येकाचे हक्क्यांचे व अधिकाऱयांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी राहिल. विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राहिल. मोठे उद्योग आणि छोटे व्यवसायीक यांच्यामध्ये संतुलन राहिल. त्याचा लाभ सामन्य लोकांनाच होईल असे गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्ष हा सर्व लोकांना एकत्र घेऊन जाणारा व एकात्मता निर्माण करणार पक्ष असून एकात्मेवर या पक्षाचा विश्वास आहे. हा पक्ष व्देष फैलावत नाही. व्देषाचे उत्तर हा पक्ष प्रेम आणि आपुलकीने देत असतो असे राहुल गांधी म्हणाले.