आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केलेला विश्वास
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फारवर्ड अशा समविचारी पक्षांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली, तर सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ निश्चितपणे मिळू शकते, असा विश्वास बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केला आहे. वार्का येथील आपल्या कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांना युतीसंदर्भात विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
नुकतेच दिल्ली भेटीवेळी आपण युतीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. युती झाली नाही, तर राष्ट्रवादी किती जागा लढविणार अशी विचारणा केली असता, सरकार स्थापनेसाठी जवळपास 22 आमदार असणे आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही 24 जागा लढवू, असे उत्तर त्यांनी दिले. आपणास युती झाली नाही, तरी फरक पडत नाही. बाणावलीची जनता आपल्यामागे असून त्यांच्या पाठिंब्यावर आपण जिंकून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खलाशांनी प्रमाणपत्रे सादर करावीत
दरम्यान, खलाशांसाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आर्थिक योजना राबविली होती. सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही ती पुढे घेऊन जात आहेत. सध्या सुमारे 800 खलाशांनी हयात असल्याची प्रमाणपत्रे सादर करणे बाकी असल्याने सर्व खलाशांचे तीन महिन्यांचे पैसे अडून पडल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी अजूनही प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत त्यांनी ती लवकरात लवकर सादर करावीत. या महिन्यात 25 पर्यंत पैसे बँकेत जमा करणे शक्मय असल्याची माहिती आपणास मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाली आहे, असे त्यांनी नजरेस आणून दिले.
टॅक्सीचालकांना मोफत मीटर देण्याचे माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर तसेच सध्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी मान्य केले होते. त्यानुसार टॅक्सीचालकांना मोफत मीटर बसवून देण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली. पर्रीकर यांनी 5 वर्षांसाठी महिन्याला दोन हजार साहाय्याची योजना खलांशासाठी तयार केली होती. त्यात आता पाचशे रु. वाढ करून दरमहिना अडीच हजार कायमस्वरूपी मिळणार आहेत, असे आलेमाव यांनी सांगितले.