प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत असताना जलवाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून ठिकठिकाणी गळत्यांद्वारे पाणी वाया जात आहे. टिळकवाडी येथील काँग्रेस रोडशेजारी गळती लागल्याने कारंजा निर्माण झाला होता. त्याद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून गेले. परिणामी टिळकवाडी भागातील विविध परिसरात पाणी समस्या निर्माण झाली.
शहर आणि उपनगरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम आणि विविध वाहिन्या घालण्यात येत आहेत. गॅस वाहिन्या व विद्युत वाहिन्या घालण्यासाठीही ठिकठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. खोदाई करताना जलवाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यापूर्वीच चरी बुजविण्यात येत आहेत. त्यामुळे गळतीद्वारे पाणी जमिनीमध्ये वाया जात आहे. दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गळती लागल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाला देण्याकडेही संबंधित कंत्राटदार आणि कंपनीचे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे गळती लागलेल्या भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे.
काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेऊन दोन वर्षे होत आली, पण अद्यापही येथील कामे अर्धवट स्थितीत आहेत. जलवाहिन्या घालण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. काही ठिकाणी गटारींचे बांधकामही अपूर्ण असल्याने खोदाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी जलवाहिन्या उघडय़ावरच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस रोडशेजारी असलेल्या हॉटेल मास्टर चिफसमोर जलवाहिनीला गळती लागून कारंजे निर्माण झाले होते. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सुमारे दोन तास पाणी वाया गेले. याबाबत पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र टिळकवाडी भागातील विविध परिसरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. लागलेल्या गळत्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेच शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विकासकामे राबविताना गळत्यांचे निवारण करणे गरजेचे असून, वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.