‘शेती बचाव अभियाना’त राहुल गांधींचा इशारा
अमृतसर / वृत्तसंस्था
सरकारने नव्याने आणलेले कृषिसंबंधीचे कायदे घातक असून भाजपप्रणित सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. देशभरातील शेतकऱयांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे काँग्रेस सत्तेत आल्यास रद्द करु, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘शेती बचाव अभियाना’त ते बोलत होते.
कृषी कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्याविरोधात काँग्रेस ‘शेती बचाव’ अभियानाची सुरुवात करत आहे. या अभियानाची सुरुवात पंजाबमधून करण्यात आली असून सरकारविरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधीही पंजाब दौऱयावर दाखल झाले आहेत. तीन दिवसांच्या या अभियानाचे नेतृत्व स्वतः राहुल गांधी करणार असून ते यासाठी ट्रक्टरदेखील चालवणार आहेत. काँग्रेसच्या या मोर्चात तीन हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात या मोर्चाची सुरुवात मोगा जिल्हय़ातून रविवारी करण्यात आली.
“मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस पार्टी सत्तेत येईल, आम्ही कृषिविषयक तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱयाच्या डब्यात फेकून देऊ.’’ या कायद्यांना पंजाब आणि हरियाणातील शेतकऱयांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले आहे. सध्याचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मूठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरियाणातील शेतकऱयांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकार ही संकल्पनाच संपवू पाहत आहे. मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिकाही राहुल गांधी यांनी यावेळी मांडली.