पठाणकोट येथील सभेत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य : आप ही काँग्रेसची फोटो कॉपी
पंजाबच्या पठाणकोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी प्रचारसभा घेतली आहे. यादरम्यान पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसला पुन्हा संधी मिळाल्यास पंजाबची सुरक्षा धोक्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखत होते. परंतु आता कॅप्टन काँग्रेसमध्ये नाहीत. आम आदमी पक्ष हा काँग्रेसची फोटो कॉपी आहे. आप आणि काँग्रेस हे पार्टनर इन क्राइम असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
दोन्ही पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा
भारताचे शूर शौर्य दाखवून देत असताना काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पाकिस्तानच्या तोंडची भाषा बोलतात. एका पक्षाने पंजाबच्या तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात लोटले, दुसरा पक्ष दिल्लीतील तरुणाईला मद्यपी करू पाहत आहे. एकाने पंजाब लुटले, दुसरा पक्ष दिल्लीत एका मागोमाग एक घोटाळे करत आहे. दोन्ही पक्ष मिळून पंजाबमध्ये नूरा-कुस्ती करत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नसताना काँग्रेसने समर्थन दिले होते याची आठवण मोदींनी करून दिली आहे.
काँगेसला सैन्याच्या पराक्रमावर संशय
काँग्रेसने पंजाब आणि देशाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात अनेक कृत्ये केली आहेत. पठाणकोटवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा देश एकजूट होता. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सैन्याच्या पराक्रमावर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने सैन्याच्या पराक्रमावर संशय व्यक्त केला होता. हुतात्म्यांच्या हौतात्म्यावर चिखलफेक करण्याचे काम केले होते असा आरोप मोदींनी केला आहे.
काँग्रेसला 3 प्रश्न विचारा
भारताची फाळणी झाले तेव्हा काँग्रेसचे नेते सरकारमध्ये होते. देशाचे तुकडे झाले तेव्हाही काँग्रेस सत्तेवर होता. सीमेपासून 6 किलोमीटर अंतरावरील गुरुनानक देव यांच्या तपोभूमीला भारतात ठेवण्याचा शहाणपणा काँग्रेसने दाखविला नाही. काँग्रेसने आमच्या भावनांना चिरडले आहे. 1965 च्या लढाईत भारतीय सैन्य लाहोरमध्ये झेंडा फडकविण्याच्या सामर्थ्यासह पुढे जात होते. जर 2 पावले आणखीन टाकली असली तर गुरुनानक यांची तपोभूमी आमच्याकडे असती. मग बांगलादेशचे युद्ध झाले, 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर गुडघे टेकले. दिल्लीत तेव्हा असलेल्या सरकारने गुरुनानक देव यांची तपोभूमी परत मिळाली तरच सैनिकांना सोडू असे बजावण्याचे धाडस का केले नाही असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले आहेत.
‘माझा’कडून मातृवत प्रेम
यापूर्वी अनेकदा पठाणकोटमध्ये आलो आहे. माझाच्या मातीने मला मातृवत प्रेम दिले आहे. मला आणि भाजपला देशाच्या अनेक राज्यांमध्ये सेवेची संधी मिळाली, तशी संधी पंजाबमध्ये मिळालेली नाही. पूर्वी आम्ही राज्यात छोटा पक्ष म्हणून कार्यरत होतो. पंजाबची एकता, शांती आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही पक्षाच्या भवितव्याची पर्वा केली नाही. 5 वर्षे सेवा करण्याची संधी दिल्यास शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना लाभ मिळवून देऊ असे उद्गार मोदींनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना काढले आहेत.
..माफिया पलायन करणार
माझामध्ये कुठलीच औद्योगिक प्रगती झालेली नाही. केवळ अवैध वाळू उत्खननात लुटीचा धंदा सुरू आहे. सरकारकडे कर्मचाऱयांवर लाठीमार करण्यासाठी पोलीस आहेत, तर खाणमाफिया महालांमध्ये मौज करत आहेत. रालोआचे सरकार सत्तेवर आल्यास पंजाबमधील माफिया पलायन करतील. पंजाबमधील तरुण-तरुणी रोजगारासाठी राज्याबाहेर जाणार नाहीत असे मोदी म्हणाले.