प्रियांका गांधी यांचे मडगावातील महिला अधिवेशनात आश्वासन
प्रतिनिधी /मडगाव
महिला सक्षम, शक्तिवान, स्वतंत्र, बंधनमुक्त असणे तसेच अभिव्यक्त होणे आवश्यक आहे. मात्र भाजपची विचारधारा महिलाविरोधी असून महिलांना रोजगार मिळवून देण्यात येथील भाजप सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास येथील महिलांसाठी नोकऱयांमध्ये 30 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनी केली आहे.
मडगावच्या कॉस्ता मैदानावर शुक्रवारी सायंकाळी गोवा महिला काँग्रेसने प्रियदर्शिनी शीर्षकाखाली आयोजित केलेल्या महिला अधिवेशनात त्या बोलत होत्या. यावेळी अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा नेटा डिसोझा, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर, मडगावच्या उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, विरोधी पक्षनेत दिगंबर कामत, आमदार प्रतापसिंह राणे, खासदार फ्रान्सिस्क सार्दिन, माजी खासदार एदुआर्द फालेरो व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. माजी अर्थमंत्री व गोवा प्रभारी पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित लोकांमध्ये समोरील रांगेत बसले होते.
आपण मोरपिर्ला गावाला भेट दिली असता तेथील महिलांच्या समस्या जाणल्या. बीए, एमएसारख्या पदव्या मिळवूनही कित्येक महिला बेरोजगार असल्याचे आपणास सांगण्यात आले. गोव्यात पर्यटनक्षेत्र तसेच अन्य स्रोतांतून रोजगारनिर्मिती करणे शक्य आहे. मात्र भाजप सरकाराने गेल्या दशकभरात सत्तेत असताना योग्य नियोजन न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. काँग्रेसचे सरकार राज्यात आल्यास खास महिलांसाठी 30 टक्के नोकऱया आरक्षित करून रोजगार मिळवून दिला जाईल, असे आश्वासन गांधी यांनी यावेळी दिले.
भाजपवाल्यांना महिला सक्षम झालेली नको
भाजपवाल्यांना महिला सक्षम व सशक्त झालेली नको आहे. महिलांना योजनांद्वारे एक गॅस सिलिंडर व काही तुटपुंजी रक्कम दिली की, आपली जबाबदारी संपली अशी त्यांची धारणा आहे, अशी टीका गांधी यांनी केली. महिलांना आता कळून चुकले आहे की, अन्य कोणी त्यांच्यासाठी लढणार नसून स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. त्यासाठी ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ हा नारा आम्ही घेऊन आलो आहोत, असे त्या म्हणाल्या.
महागाईने गृहिणींचे कंबरडे मोडले
महिलांचे जीवन संघर्षमय आहे. सगळीकडे त्यांना संघर्ष करावा लागतो. सध्या महागाईने गृहिणीचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, तेल, अन्य जीवनाश्यक वस्तूंच्या किमती सामान्यांच्या हाताबाहेर गेल्या असून घरचे बजेट सांभाळण्यासाठीही महिलेलाच संघर्ष करावा लागत असतो, असे त्यांनी नजरेस आणून दिले.
महिला पोलिसांची मोठी भरती करणार
राज्यात महिलांवरील अत्याचारांत मोठी वाढ झाली आहे. बलात्कार, खून वाढले आहेत. 95 टक्के अत्याचाराची प्रकरणे पडून आहेत. बलात्कार झाल्यानंतर येथील मुख्यमंत्री एवढय़ा रात्री महिला घराबाहेर का पडतात तसेच अशा प्रकारचे कपडे का परिधान करतात असे म्हणून महिलांकडेच अंगुलीनिर्देश करतात. अन्याय झालेल्यांना न्याय मिळण्याऐवजी अत्याचार करणाऱयांची पाठराखण केली जात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास पोलीस स्थानकांमध्ये वाढ करताना महिला पोलीस कर्मचाऱयांची मोठी भरती करण्यावर भर दिला जाईल. यामुळे महिलांना आपली बाजू मांडून पोलीस स्थानकात न्याय मिळणे शक्मय होईल, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी
स्वयंसेवी संस्थांमार्फत महिला सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. मात्र भाजप याकडे दुर्लक्ष करत आले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास अशा संस्थांना मिळणाऱया अनुदानाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त 1 लाखापर्यंतचे कर्ज मिळवून दिले जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून येथे मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. मात्र या क्षेत्रात आवश्यक त्या क्षमतेने रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत येथील सरकार नियोजनाच्या अभावी कूचकामी ठरले आहे. त्यामुळे गोव्यात बेरोजगारी वाढली आहे. सामान्यांना रोजगार मिळत नाही. मात्र नोकऱयांसाठी मंत्र्यांच्या पीएना शंभरपैकी शंभर गुण मिळतात, असे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढविला.
काँग्रेसकडून महिलांच्या भल्यासाठी संघर्ष
महिला म्हणजे समाजाचा पाया आहे. त्यामुळे काँग्रेसने नेहमीच महिलांच्या भल्यासाठी संघर्ष केला. महिला सशक्त झाल्या, तर समाज, देश सशक्त होईल, असे त्या म्हणाल्या. भाजप सरकारने भूमिपुत्र विधेयक आणून परप्रांतियांचे तसेच उद्योगपतींचे हित त्यांना स्थानिकांच्या हितापेक्षा जास्त महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका त्यांनी केली.
कोळसा वाहतुकीसाठी दुपदरीकरणाचा खटाटोप
आपण आजच काही कार्यकर्त्यांना भेटले. त्यांनी रेल्वेमार्ग दुपदरीकरणासाठी मोले येथे जंगलतोड करण्यात येत असल्याचे तसेच यातून गोमंतकीयांचा कोणतीही फायदा वा विकास होणार नसून एका उद्योगपतीसाठी हा सगळा घाट घालण्यात आला आहे असे नजरेस आणून दिले. भाजपला उद्योगपतींची जास्त चिंता आहे, अशी खरमरीत टीका गांधी यांनी यावेळी केली. जनतेच्या सेवेसाठी समर्पित पक्षाला आपला कौल द्या, असे आवाहन त्यांनी केले.
गोवा वाचविण्याची शेवटची संधी महिलांची संख्या 50 टक्के असून सर्व बाबींचा विचार करून, आपले भविष्य, आपल्या प्रदेशाचा विकास व आपली सुरक्षितता ध्यानात ठेवून मतदान करावे, असे आवाहन यावेळी गांधी यांनी महिलांना उद्देशून केले. गोवा गोमंतकीयांच्या हातात राहण्याची गरज आहे. गोमंतकीयांसाठी गोवा बरबाद होण्यापासून वाचविण्याची ही शेवटची संधी आहे. ज्यांना तुमची पर्वा नाही अशांच्या हाती पुन्हा सत्ता गेल्यास ते गोव्यासाठी मारक ठरेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. गोव्याची संस्कृती व प्रदेश वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीत विचार करून मतदान करा, असा सल्ला गांधी यांनी उपस्थितांना दिला. यावेळी आमदार डॉ. निंबाळकर, नेटा डिसोझा, बीना नाईक यांनी आपले विचार मांडले. रॉयला फर्नांडिस यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.