ज्वालामुखीच्या उदेकातील अनेकांचे वाचविले प्राण : बचाव कार्यात बेडकिहाळचा जवान सूरज नलवडेचा समावेश, जवानांच्या कार्याचे कौतुक
कृष्णा द. आरगे /बेडकिहाळ
तारीख 22 मे 2021, वेळ सायंकाळी 6 वाजून 30 मिनिट. नियतीच्या मनात काहीतरी भलताच होत. अचानक कांगो देशातील गोमा शहराजवळील असलेल्या नायरा गोंगो येथे ज्वालामुखीचा उदेक झाला. ज्वालामुखीचा लाव्हा अत्यंत वेगाने लोकवस्तीच्या दिशेने वाहू लागला. यामुळे सर्वत्र हाहाकार मजला. जीवाच्या आकांताने लोक सैराभैरा होऊ लागले. तीव्र लाव्हा रसामुळे अनेक घरे नष्ट झाली. हजारो लोक बेघर झाले. यामध्ये कित्येकांनी प्राण गमावले. मुक्मया निष्पाप जनावरांचे प्राण गेले. हजारो लोकांना उत्तर आणि पश्चिम साके शहरात स्थलांतरित व्हावे लागले. या आपत्कालीन परिस्थितीत तेथे संयुक्त राष्ट्र शांतीसेनेमध्ये भारताच्यावतीने तैनात असलेल्या सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मदतकार्य हाती घेतले. त्यामुळे अनेक लोकांना वेळीच मदत मिळाली. या कार्यात बेडकिहाळ येथील जवान सूरज नलवडे हेदेखील सहभागी झाले होते.
जगातील विविध भागात युद्ध, गृहयुध्द, जातीय संघर्ष आदी विविध कारणांमुळे अशांत असलेल्या भागामध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने शांती सेना तैनात केली जाते. संयुक्त राष्ट्र संघाकडे स्वतःचे सैनिक नाहीत. त्यामुळे सदस्य राष्ट्रांच्या सेनेच्या तुकडय़ांची यासाठी मदत घेतली जाते. भारत नेहमीच जगात शांतता प्रस्थापित करणाऱया देशांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यानुसार भारतीय सेनेच्या विविध रेजिमेंटचे अनेक जवान शांती सेनेद्वारे आपले योगदान देत असतात.
विशेष करून आफ्रिका खंडातील अनेक भाग अशांत असल्याने अशा ठिकाणी अनेक देशांच्या शांतीसेनेच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. या खंडातील कांगो देशाच्या एका भागात भारतीय सेनेच्या मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कर्तव्य, मान, साहस हे त्यांचे ब्रिद वाक्य. संकट कोणतेही असो छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे संकटावर तुटून पडतात. यासाठी इतिहास साक्षीला आहे.
कांगो येथील गोमा शहराजवळील ज्वालामुखी जागृत होताच मोठय़ा संकटाची चाहूल लागली. त्या परिसरातील नागरिकांना मदतीची गरज आहे, याची माहिती मिळताच शांतीसेनेतील मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी पुढे सरसावले. अगदी देवदूताप्रमाणे भारतीय जवान गोमातील जनतेसाठी धावून गेले. लाव्हा असलेल्या धोक्याच्या ठिकाणापर्यंत भारतीय जवान पोहचून तेथील नागरिकांना सुरक्षितपणे तेथून बाहेर काढले.
आपल्या जीवाची पर्वा न करता माणुसकीचा धर्म आणि कर्तव्यापायी भारत मातेच्या या जवानांनी जीवाचे रान केले. संसाधनांची कमतरता, परका देश आणि त्यात आग ओकणारा ज्वालामुखी असे असतानाही आपले वीर जवान संकटाला पुरून उरले. सतत पंधरा दिवस हे जवान अहोरात्र मेहनत घेत तेथील जनतेला सुरक्षित ठिकाणी पोहचवूनच सुटकेचा निःश्वास
सोडला.
जवानांच्या कार्याबद्दल स्तुती
हे कार्य एवढय़ावरच संपले नाही. ज्वालामुखीचे संकट टळल्यावर येथील लोक आपल्या घराकडे वळू लागले. त्यांचीही व्यवस्था केली. कांगो देशात भारतीय लष्करासोबत उरुग्वे, पाकिस्तान, बांगलादेश, युपेन, साऊथ आफ्रिका, फ्रांस, मोरोक्को, सेनेगल, चोरडोंन, कियुनिशिया, माळाबा, यझेरिया, ब्राझील, पॅराग्वे, रशिया आदी देशाचे लष्करही कार्यरत होते. या लष्कराचे अधिकारी, युनाटेड नेशनचे अधिकारी, कांगोतील राजकीय व्यक्तींनी सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी आणि जवानांनीही भारतीय जवानांच्या धाडशी कार्याबद्दल स्तुती केली.
सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीच्या मावळय़ांना सलाम
सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीचे कार्य भारतीय सेनेच्या समपर्क वृत्तीच ज्वलंत उदाहरण आहे. कांगोसारख्या देशात शांतीसेनेचे कार्य करण्यासाठी पोहचलेली फौज स्वतः सावरण्या अगोदर नैसर्गिक आपत्तीत ते दुसऱयांना सावरण्याचे काम करत होते. फक्त शरीराने नाही तर मनानेदेखील ते सावरले होते. कर्तृत्व आणि हिंमतीच्या बळावर जगात भारताचे नाव उंच शिखरावर नेऊन ठेवणाऱया या सेव्हन मराठा लाईट इन्फंट्रीच्या मावळय़ांना सलाम. या बचाव कार्यात बेडकिहाळचा जवान सूरज रावसाहेब नलवडे याचादेखील समावेश असल्याने बेडकिहाळकरांची मान जगात उंचावली आहे. सूरजच्या या धाडशी कार्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.