ऑनलाईन टीम / मुंबई :
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात भारत बंदची हाक देणाऱया बहुजन क्रांती मोर्चाने आज मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
रेल रोकोमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणारी वाहतूक 15 मिनिटे उशीरा सुरू आहे. ऐन सकाळी गर्दीच्या काळात वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. सीएए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी आज बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा रेल रोको करण्यात आला. अर्धा तास रेल रोको केल्यानंतर रेल्वे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यस्ती करून ही वाहतूक पूर्ववत केली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.