सातारा / प्रतिनिधी :
कोयना धरणाच्या फुगवटा परिसरातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाट बन गावातील शेतकरी पिढय़ान् पिढय़ा तेथील जमिनी कसत आहेत. मात्र, त्या जमिनी त्यांच्या नावावर नसल्याने आता अतिवृष्टीत प्रचंड नुकसान होवून त्यांचे पंचनामे झाले नाहीत. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत देखील मिळाली नाही. या 27 गरीब शेतकरी कुटुंबांना जमिनी त्यांच्या नावे करुन त्यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी भजन सम्राट राजारामबुवा शेलार यांनी केलीय. यासंदर्भात शेलार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत संतोष मालुसरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कांदाट बन येथे गेल्या 200 वर्षांपासून या शेतकऱ्यांच्या सहा, सात पिढय़ा रहात आहेत. गावातील कब्जातील जमिनीवर 40 घरे व गुरांसाठी कायमस्वरुपी गोठेही बांधलेले आहेत. गावठाण वसल्याने वीज जोडणीही दिली असून घरपट्टीही ते ग्रामपंचायतीकडे भरत आहेत. पूर्वांवर जी जमीन या प्रत्येक कुटुंबाच्या वाटय़ाला आलेली आहे ती जमीन कसून ही 27 कुटुंबे उदरनिर्वाह करत असतात. मात्र, एवढय़ा वर्षांनंतरही या जमिनीच्या सातबारा सदरी सरकार अशी नोंद आहे. या कुटुंबातील अशिक्षित असल्याने त्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने आम्ही कसत असलेल्या जमिनीवर आमच्या मालकी नावाची नोंद करुन आमच्यावरील भूमीहिनाचा शिक्का पुसून काढून हक्काची जमीन द्यावी, अशी मागणी कांदट बनचे चंद्रकांत ढेबे यांच्यासह सरपंच मनिषा ढेबे, पोलीस पाटील प्रकाश बर्गे, राजाराम ढेबे, लक्ष्मण ढेबे, रामचंद्र बर्गे, दीपक बर्गे, सतीश ढेबे यांच्यासह 27 शेतकरी कुटुंबांनी केली आहे.