पाऊस-नवरात्रोत्सवामुळे एपीएमसी बाजारात आवक घटली
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
कांदा, बटाटा, रताळी उत्पादक क्षेत्रात परतीचा पाऊस आणि शुक्रवारी अमावास्या, शनिवारी नवरात्रोत्सवाला प्रारंभ यामुळे बाजारात आवक घटली. त्यामुळे कांदा दरात 500 पासून 1500 रु. वाढ झाली तर बटाटा आवक कमी होऊनसुद्धा जवारी बटाटय़ाचे भाव स्थिर होते. पराज्यांतील बटाटा 100 रुपयांनी कमी झाला. तर रताळी दरामध्ये 200 रुपयांची वाढ झाली.
शनिवारी बाजारात 22 ट्रक कांदा आवक झाली. सफेद कांदा 100 पोती आवक होती. 22 ट्रकपैकी 7 ट्रक कर्नाटकातील कांदा आवक ही मुधोळ, जमखंडी, बागेवाडी परिसरातून आली होती. यामध्ये जुना कांदा 5 ट्रक तर नवीन कांदा 2 ट्रक आवक होती. उर्वरित 15 ट्रक कांदा आवक ही महाराष्ट्रातील पुणे व नगर परिसरातून जुना कांदा आवक झाली होती.
नवीन कांदा प्रति क्विंटल 1500 रु., जुना कांदा 1000 रु. तर सफेद कांदा 500 रुपयांनी वधारला असल्याची माहिती व्यापारी विकी (महेश) सचदेव यांनी दिली.
कांद्याचे भाव
नवीन 2000 ते 5000 रु.
जुना 3500 ते 6500 रु.
सफेद 5000 ते 5500 रु.
बाजारात परराज्यांतील बटाटा आवक 13 ट्रक होती. मागील बाजारापेक्षा 1 ट्रक बटाटा आवक कमी होऊनसुद्धा जावक थंडावली. परिणामी इंदोर बटाटा आणि तळेगावचा बटाटा 100 रु.नी कमी झाला. बाजारात इंदोरचा बटाटा 8 तर तळेगावचा 5 ट्रक आवक होती, अशी माहिती व्यापारी दीपक (राजदीप) पाटील यांनी दिली.
इंदोर बटाटा 2800-3200 रु.
तळेगाव 2600-3000 रु.
बटाटा-रताळी उत्पादक क्षेत्रात परतीच्या पावसाचा तसेच अमावास्येनिमित्त बऱयाच भागात पाळणूक असते. दसऱयाची अमावास्या यानिमित्त घरातील स्वच्छता यामुळे बाजारात रताळी, बटाटा आवक कमी होती. बटाटा आवक कमी असल्यामुळे बाहेरील राज्यांमध्ये पाठवण्याइतका बटाटा बाजारात उपलब्ध नव्हता. याचा परिणाम बाजारात आवक कमी होऊनसुद्धा जवारी बटाटय़ाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी वाय. सी. चव्हाण यांनी दिली.
नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असल्याने चांगल्या प्रतीच्या रताळी मागणीत वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून रताळी दरात 200 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी राजू पाटील यांनी दिली.
जवारी बटाटय़ाचे भाव
गोळी 1000 ते 1200 रुपये
मध्यम 2400 ते 2600 रुपये
मोठा 3000 ते 3500 रुपये
रताळी 1200 ते 1600 रुपये