न्यायालयाची दिशाभूल सुरू असल्याचा व्यापाऱयांचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
कांदा मार्केटमधील गाळय़ांवर महानगरपालिका आणि वक्फ वेगवेगळय़ा प्रकारे आपला हक्क असल्याचा दावा करत आहेत. न्यायालयाची दिशाभूल करून गाळेधारकांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप येथील व्यापाऱयांनी केला आहे. शनिवारी दुपारी नोटीस देण्यासाठी न्यायालयाचा बेलिफ गेला असता त्यांची व व्यापाऱयांची चांगलीच बाचाबाची झाली. यामुळे काहीवेळ त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कांदा मार्केटचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना येथील न्यायालयामध्ये स्वतंत्र दावा दाखल करून मुख्य खटल्याला बगल देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप होत आहे. महानगरपालिकेने काही जणांना हक्कपत्रे दिली आहेत तर वक्फवाल्यांनीही काही जणांना हक्कपत्रे दिली आहेत. मात्र, मूळ गाळामालक दुसराच आहे. एक प्रकारे साऱयांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शनिवारी दुपारी न्यायालयाचा बेलिफ आल्यानंतर यावेळी कांदा व्यापारी आणि त्यांच्यामध्ये वादाचा प्रसंग घडला. यावेळी अनेक क्यापाऱयांनी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना अशाप्रकारे नोटीस देणे योग्य नाही, असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. असोसिएशनने एकूण 53 जणांना गाळे दिले आहेत. त्यामधील काही गाळय़ांवर वक्फ हक्क गाजवत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्याविरोधात येथील न्यायालयात व्यापाऱयांनी धाव घेतली होती. त्याठिकाणी येथील न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. या व्यापाऱयांच्यावतीने ऍड. शरीफ सनदी यांनी काम पाहिले.