नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याचा साठा करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या नव्या निर्बंधांमुळे व्यापाऱयांनी कांद्याचे लिलाव बंद केल्याचे दृश्यही ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये शनिवारी दिसून येत होते.
देशात बऱयाच भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतात कांद्याचे पीक नष्ट झाले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. नवीन पीक फेब्रुवारीमध्ये येईपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या सणासुदीमुळे कांद्याच्या मागणीतही वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस दर वाढत चालले आहेत. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 6 हजार 800 रुपयांवर पोहोचला होता. सद्यकाळातील कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. या वाढत्या दराला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने साठेबाजीवर निर्बंध घालण्याचे पाऊल उचलले आहे.