राखणदारांना अर्पण केल्यामुळे दिसते आजच्या मुलांना
जगन्नाथ मुळवी /मडकई
बदलत्या जीवन शैलीमुळे गुराखी व शेतकऱयांनी जरी “घोंगडीला’’ पाठ फिरवून, छत्री हातात धरली. तरी पारंपारिकतेची भगभगती मशाल व दुसऱया हातात मानवाच्या कल्याणार्थ धरलेला दांडा जमिनीवर आपटत, खांद्यावर “घेंगडी’’ घेऊन गावच्या वेशीवर उभ्या असलेल्या देवचार व राखणदारांनी मात्र “कांबळ’’ सोडलेली नाही. म्हणूनच त्यांच्या चरणी “कांबळीं’’ चा ढीग आहे आणि त्यामुळेच आजच्या मुलांना “कांबळी’’ पाहण्याचे भाग्य लाभलेले आहे…..! नाही तर याच “कांबळी’’ माणसांच्या दैनंदिन जीवनातून कधीच्याच परागंदा झाल्या असत्या.
गेल्या 40 वर्षात माणसांने वेगाने प्रगती साधूनही माणसांच्या जीवनातले आनंदाचे रंगच उडून गेलेले आहे. प्रगती साधताना पारंपारिक गोष्टींचे संर्वधन केलेले नसल्यामुळे आनंद हरवत चाललेला आहे. खांद्यावर घोंगडी टाकून दारात येऊन शंखनाद करणारे गोसावी अदृष्य झाले. खांद्यावर घोंगडी व हातात ढोलकी घेऊन मृत माणसाची कुळी वाचून दाखवणारे बहुरूपीया गायब झाले. गावा गावात धावणारी बैलगाडी व कांबळ घेऊन बैलगाडीवर बसलेला गाडीवान कालबाहय़ झाला. एकाच सायकलवर तिघेजण बसून प्रवास करणारे दिवस सरले. जुन्या वहींची पाने फाडून बाईंडींग करून बनवलेल्या नवीन वहींची पानेसुद्धा कोरीच राहिलेली आहे. आई वडीलांच्या कांबळीत शिरून पावसाच्या साचलेल्या पाण्यावर पाय मारून भिजण्याचा आनंदही हरवला आहे. शेती ओस पडल्या, गुराखी हा शब्दच शब्दकोशातून लुप्त झाला. गोसावी अदृष्य झाले आणि विद्यमान युवा पिढी यासर्वांपासून अनभिज्ञ राहिली. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱया केवळ मशालीमुळेच “कांबळ’’ लखलखू लागली…..!
देवचार व राखणदारांनी जपल्या म्हणून ‘कांबळी’चे महत्त्व अधोरेखीत होत आहे. छत्री हे आधुनिकतेचे प्रतिक ठरत असले, तरी ‘काबंळ’ ही ऐतिहासीक आहे. बहुउद्देशीय असलेल्या या कांबळीचा भाव वाढत चाललेला आहे. थंडी पावसापासून संरक्षण देणारी कांबळ, पसरत असलेला अग्नीसुद्धा विझवण्यासाठी तिचा वापर केला जात होता. 100 रूपयांना मिळणाऱया कांबळीचा भाव एक ते दिड हजार रुपयांपर्यंत वाढलेला आहे. 50 वर्षांपूर्वी सर्रास वापरणाऱया कांबळी त्याकाळी मोजक्याच विपेत्यांकडे असायच्या. परंतु गावच्या राखणदारांसाठी या कांबळीची विक्री अनेक ठिकाणी होत आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनात अंत्यत महत्त्चाची असलेली ही कांबळ अदृष्य होत आहे. पण तिच कांबळ देवचार व राखणदारांकडे प्रंचड प्रमाणात असलेल्या पहायला मिळतात. पूर्वी मिळणाऱया कांबळीत आणि आताच्या कांबळीत जमिन आसमानाचा फरक पडलेला आहे. जाडजूड व वजनदार असणाऱया कांबळीच्या उत्पादनात खूप मोठा फरक आहे. आताच्या कांबळीची जाडी कमी व वजनाने हलक्या असतात. पण तरीसुद्धा कांबळीच्या धंद्याला बरकत आलेली आहे. वापरण्यासाठी नव्हे तर केवळ देवचार व राखणदारांना प्रसन्न करून घेण्यासाठी. नवसापोटी देवचारांच्या चरणी कांबळीचा खच पडलेला दृष्टोपतास येत असतो….!
फर्मागुडीच्या पठारावर कटमगाळ देवचाराला 30 वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कांबळी येत होत्या. बदलत्या काल प्रवाहात भक्तांची श्रध्दा वाढीस निघाली म्हणून वर्षाकाठी हजारोंच्या संख्येने कांबळी भेट स्वरूपात भक्त देऊ लागलेले आहेत. कटमगाळ देवचाराविषयी असलेली भक्तांची श्रध्दा दृढ होत असल्यामुळे या कांबळीच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. म्हापसा येथील प्रसिध्द बोडगेश्वर, मडकईचा आम्रेकर, कुर्टीचा कोटा देवचार, नेरूलचा देवचार, कुळेचा दुधसागर देवचार. आगापूरचा चिकोलकार, गोव्यात असे कितीतरी देवचार व राखणदार आहेत. भक्त त्यांना इतर वस्तूंबरोबर कांबळी अर्पण करीत असतात. त्यामुळे या कांबळी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरिकांनाही पाहायला मिळतात. परत एकदा या कांबळी उपयोगात आणण्यासाठी सेवाभावी संस्थानी पूढाकार घेणे आवश्यक आहे. देवचारांच्या चरणी असंख्य असलेल्या या कांबळी वाया जात असलेल्या पाहून मनाला क्लेश होत आहे. देवचार व राखणदारांना अर्पण झाल्यानंतर एका महिन्यात या कांबळी देवचार व राखणदारांची मान्यता घेऊन तळागाळातल्या सामान्य जनांना वापरण्यास दिल्यास ते जास्त संयुक्तीक ठरेल. तरच खऱया अर्थाने देवचार व राखणदार यांच्या कांबळी घराघरात पोहचेल व त्यांचे संर्वधनही होईल. खऱया अर्थाने देवचाराचा आशिर्वाद त्यांना लाभल्याचे समाधान त्यांच्या चेहऱयावर दिसू लागेल. देवचार व राखणदार यांच्या मान्यते शिवाय कसल्याही गैरगोष्टी केल्यास त्यांची अवकृपा व कोप होत असतो. देवचारांची मान्यता असल्यास त्यांच्याच भक्तांची सोय होईल व त्यांनी जपलेली ही कांबळीची पारंपारिकता मशालीच्या प्रकाशात खऱया अर्थाने चमकतील…!