निर्जंतुकीकरणाचे काम होत नसल्याने भीतीचे वातावरण : ग्रा. पं. ने लक्ष देण्याची गरज
वार्ताहर / काकती
काकतीत आठवडय़ाभरात 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य विभागाच्या सूत्राकडून समजले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीचे गाव असल्याने मोठय़ा संसर्गाचा धोका असून काकती ग्रा. पं. व ग्रामस्थांनी गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित राहणे आवश्यक आहे.
गेल्या गुरुवार दि. 20 रोजी प्रथम दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना होमक्वारंटाईन ठेवण्यात आले होते. पुन्हा गुरुवार दि. 27 रोजी राणी चन्नम्मा रोड व इतर ठिकाणी असे एकूण 8 रुग्ण आढळून आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतमाल विक्री, जीवनोपयोगी वस्तू खरेदी करताना सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, प्रत्येकाने मास्क वापरणे, सार्वजनिक व्यवहाराच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे, सर्दी पडसे असल्यास औषधोपचार घेणे, अतिआवश्यक झाले आहे.
काकती ग्रा. पं. ने ग्रामस्थांच्या आराग्याच्या दृष्टीने व्यावसायिक आस्थापने, बँका, मंदिरे, मस्जिद आदी ठिकाणी कठोर निर्बंध घातले असून बँकांच्या एटीएम कक्षाचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. प्रत्यक्ष एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
तसेच 18-20 वर्षाची मुले मोटारसायकलवरून इकडे तिकडे धूम ठोकत आहेत. अशा मुलांवर देखील काकती पोलिसांनी निर्बंध घालणे गरजेचे आहे. तर नागरिक महिलांनी देखील आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अंतर ठेवून कामे करणे ही काळाची गरज आहे.
एटीएमपासून धोका
काकती हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने देशभरातील प्रवासी व व्यावसायिक पैसे काढण्यासाठी येथील एटीएम सुविधेचा आधार घेत आहेत. एटीएममधून पैसे काढताना ग्राहक मशीनच्या बटनांना स्पर्श करतात. प्रत्येक पैसे काढणारी व्यक्ती बटनांना स्पर्श करीत असल्याने कोरोना संसर्गाची भीती नाकारता येत नाही. यामुळे काकतीसह जवळपास असणाऱया होनगा, बेन्नाळी, देवगिरी, गौंडवाड तसेच येथील दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शिवाय निर्जंतुकीकरणाचे काम होत नसल्याने भीतीचे वातावरण आहे.