काकती / वार्ताहर
राणी चन्नम्माने स्वातंत्र्याचा स्वाभिमान जागविला असून तिने दिलेला लढा व त्याग अविस्मरणीय आहे. असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काढले. काकती येथे राणी चन्नाम्मा विजयोत्सव शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संसर्गाचे संकट असल्याने साधेपणाने साजरा करण्यात आला. राचय्या महास्वामी, उदयस्वामी यांच्या सानिध्यात पूजनाचा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांनी राणी चन्नम्मा पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनी स्वागत केले. यावेळी प्रमुख उपस्थित अधिकारी आयजीपी राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त के. त्यागराज, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. डीसीपी डॉ. विक्रम आमटे, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, काकतीचा देसाईवाडा, किल्ला, राष्ट्रीय महामार्ग संपर्क रस्ता आदी विकासकामांबाबत नोव्हेंबर महिन्यात होणाऱया बैठकीत विषय घेणार असून काकतीची ऐतिहासिक मूल्ये जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे आश्वासन दिले. यावेळी नेते मारूती अष्टगी, महेश दुंडगी, लक्ष्मण कोळेकर यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. बैलहोंगलहून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. कोरोनायोद्धा डॉ. ए. डी. पाटील यांचा जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, बाबासाहेब देसाई, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, काकती पीडीओ आश्विनी कुंदर, होनगा पीडीओ दीपक गवी, शशिकांत पाटील, आर. के. पाटील, शंकर सुळकुडे, प्रभाकर इंचल, परशराम नार्वेकर, पंचायत प्रशासक सुभाष हुप्पीहोळी, नरेगा अधिकारी राजेंद्र मोहम्मद, गजानन गव्हाणे उपस्थित होते.