वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
मनुष्याला जसा जीव आहे, तसा मातीला सुद्धा जीव आहे. मनुष्याला आजारी असताना औषधांचा ओव्हरडोस झाल्यास मनुष्य दगावतो तसेच मातीसुद्धा अधिक रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन नापीक बनते. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱयांनी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करावा. जमिनीची सुपीकता वाढवून भरपूर अन्नधान्य पिकवून आपल्या आर्थिक जीवनामध्ये यशस्वी होण्याचे विचार काकती रयत संपर्क कृषी केंद्राचे कृषी अधिकारी अरुण कापसी यांनी शेतकऱयांना उद्देशून मांडले.
कंग्राळी बुद्रुक येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने माती परीक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी शेतकऱयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील होते.
व्यासपीठावर निजलिंगप्पा साखर संशोधक केंद्राचे संशोधक आर. बी. सुतगुंडी, कलमेश्वर सोसायटीचे व्हा. चेअरमन सुभाष हुद्दार, माजी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, तलाठी सुरेश शिंगे, हभप बसवंत मंगाण्णाचे आदी उपस्थित होते.
कापसी पुढे म्हणाले, शासनाकडून शेतकऱयांसाठी सवलतीच्या दरात शेतामध्ये विहीर खोदाईसाठी, जनावरांचा गोठा बांधण्यासाठी, पॉवर ट्रेलर, पल्टी नांगर, रोटरी, स्पिंकलर, पीव्हीसी पाईप, सागवानी, निलगिरी झाडांची रोपे, शेवया मशीन व शेतीची इतर अवजारे मिळतात. आपल्या भागातील कृषी संपर्क कार्यालयात भेट देऊन योजनांचा शेतकऱयांनी लाभ घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
निजलिंगप्पा साखर संशोधन केंद्राचे संशोधक आर. बी. सुतगुंडी म्हणाले, जमीन ही अनमोल आहे. या जमिनीमध्ये पिकलेले अन्नधान्य भाजीपाला फळे खाऊन आम्ही जगतो. चारा खाऊन जनावरे जगतात. या मातीची सुपीकता कमी होऊ देऊ नका, जमिनीमध्ये शेणखताबरोबर सेंद्रीय खत वापरा तसेच लागवडसाठी ऊस रोप, भात रोप, भाजीपाला रोपे, मिरची रोपे स्वत: शेतामध्ये तयार करून आपली सुपीक शेती करून आपली अर्थिक उन्नती करून घेण्याचे आवाहन केले.
प्रारंभी उचगाव रयत संपर्क केंद्राचे सहाय्यक कृषी अधिकारी सी. एस. नायक, यांनी उपस्थित अधिकारी व शेतकरी वर्गाचे स्वागत करून कृषी खात्याकडून शेतकऱयांना मिळणाऱया योजनांची माहिती दिली. सभेत शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. ग्राम पंचायत कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले.