वार्ताहर / काकती
देसाई गल्ली येथील उड्डाणपुलातून मार्गक्रमण करताना दुचाकीस्वारांनी संयम ठेवून गाडी चालवावी, अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे.
येथील राष्ट्रीय महामार्गाच्या भिंतीने गावचे विभाजन झाले असून सर्व्हिस रस्त्यावर वाहनांची सारखी वर्दळ चालू असते. देसाई गल्ली येथील राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाणपूलचा हा प्रमुख प्रवेशद्वार असून हा अरुंद असल्याने मार्गक्रमण करणे तारेवरची कसरत झाली आहे. तर सायंकाळी 5 वाजल्यानंतर देसाई गल्ली येथील भाजी मार्केटला भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक व महिलांची मोठी गर्दी असते. तसेच पायी चालत जाणाऱया नागरिकांची देखील मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत सर्व्हिस रस्त्यात बेळगावकडे ये-जा करणाऱया दुचाकी, चारचाकी, सायकली आदींची रेलचेल चालू असते. यावेळी उड्डाणपुलातूनही वर्दळ सुरू असते. येथून मार्गक्रमण करणारा युवावर्ग दुचाकीवर नियंत्रण ठेवत नसल्याने लहान-सहान अपघात घडत आहेत. उड्डाणपुलातून मार्ग अरुंद असल्याने दोन्ही सर्व्हिस रस्त्यात अपघातांना सामोरे जावे लागत आहे. तरी दुचाकीस्वारांनी येथून मार्गक्रमण करताना सामाजिक भान ठेवून संयम पाळावा, अशी मागणी होत आहे.