वार्ताहर /काकती
काकती-होनग्यात राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यात बसथांबे बांधले नसल्याने ग्रामस्थ, नागरिक व महिलांची ऊन-पावसात गैरसोय होत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गेली 20 वर्षे दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
गेली 20 वर्षे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून काकती, होनग्यातील ग्रामस्थांना बेळगावला ये-जा करण्यासाठी प्रवासी थांबा अद्यापि बांधण्यात आला नाही. काकती येथील मुत्तेनट्टी क्रॉस ते मोटार बॉडीबिल्डर्स गॅरेजीसपर्यंत दीड कि. मी. चे अंतर असून किमान तीन प्रवासी थांबे तर होनग्यात मराठी शाळेजवळ ते बेन्नाळीपर्यंत दोन प्रवासी थांब्यांची गरज आहे. पण बसथांबे नसल्याने ऊन-पावसात प्रवासीवर्गाची प्रचंड ससेहोलपट होत आहे. याचबरोबर सर्व्हिस रस्ता खराब असल्याने प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. या सर्व्हिस रस्त्यात बसथांबा नसल्याने बसेस, वडाप राष्ट्रीय महामार्गावरून धावत असतात. राष्ट्रीय महामार्गावर बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी लहान-मोठे अपघात होत आहेत. मात्र, याची पर्वा बसचालकांना नाही. ग्रामीण भागात आधुनिक बसथांब्यासाठी रुरअर्बन मिशन अंतर्गत पंचायत राज इंजिनिअरिंगच्यावतीने आधुनिक बसस्थानक उभारणीसाठी किमान एका बसस्थानकाला पाच लाखापासून ते दहा लाखापर्यंत राखीव निधी राज्य सरकारने ठेवला आहे. या योजनेतून बसस्थानक उभारणीकडे आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले आहे.