आत्मघाती फलंदाजीमुळे भारताला दगाफटका, न्यूझीलंड आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेते
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
घरच्या मैदानावर हवी तशी खेळपट्टी तयार करवून त्यावर प्रतिस्पर्ध्यांना लोटांगण घालण्यास भाग पाडणारा भारतीय संघ विदेशी भूमीत मात्र प्रतिकूल खेळपट्टय़ांवर अक्षरशः कागदी वाघ ठरतो आणि न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये जणू हीच बाब आणखी एकदा अधोरेखित झाली. प्रतिकूल वातावरणात प्रतिकूल खेळपट्टीवर खेळताना विराटसेनेची बुधवारी पुन्हा एकदा त्रेधातिरपिट उडाली आणि याचवेळी न्यूझीलंड संघाने मात्र मैदानी वाघ कशी विजयी डरकाळी फोडतो, याचे प्रॅक्टिकल सादर करत विराटसेनेच्या मर्यादा शब्दशः चव्हाटय़ावर आणल्या. 45.5 षटकांत 2 बाद 140 धावा जमवित न्यूझीलंडने जेतेपद पटकावले. केन विल्यम्सन 52 व रॉस टेलर 47 धावांवर नाबाद राहिले.
केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा 8 गडी राखून धुव्वा उडवला व प्रदीर्घ कालावधीनंतर आयसीसी चषकावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. कसोटी क्रिकेटमधील ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा असल्याने यामुळे देखील न्यूझीलंडच्या या जेतेपदाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
एजिस बॉल स्टेडियमवरील या निर्णायक लढतीत भारताने 2 बाद 64 या मागील धावसंख्येवरुन पुढे खेळताना अवघ्या 106 धावांमध्येच चक्क 8 फलंदाज गमावले आणि 170 धावात डाव खुर्दा झाल्याने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 53 षटकात 139 धावांचे आव्हान असेल, हे स्पष्ट झाले. व्यावसायिकता नसानसात भिनलेल्या किवीज संघाने ही संधी साधण्यात अजिबात कसूर न करता भारतीय कागदी वाघांची सहज शिकार केली!
विजयासाठी 139 धावांचा पाठलाग करताना अश्विनने टॉम लॅथम (9) व डेव्हॉन कॉनवे (19) या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. मात्र, अंतिमतः हे केवळ पेल्यातील वादळ ठरले. कर्णधार केन विल्यम्सन व रॉस टेलर यांनी मजल-दरमजल प्रवास करत सहज विजय संपादन करुन दिला. या जोडीने अतिसाहसी फटके मारण्याऐवजी संयमी फलंदाजीवर भर देत केवळ खराब चेंडूंचा समाचार घेण्यावर अधिक भर दिला आणि त्यांची हीच रणनीती भारतीय गोलंदाजांवर भारी पडली. या मालिकाविजयासह न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगच्या कारकिर्दीचा विजयी समारोप झाला. आपण या मालिकेनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा वॅटलिंगने यापूर्वीच केली होती.
न्यूझीलंडची वनडे वर्ल्डकप पराभवातील भरपाई, विराटसेना मात्र दोन्हीकडे पराभूत!
इंग्लिश भूमीतच 2019 साली संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला अगदी शेवटच्या चेंडूवर विजयाने हुलकावणी दिली होती, त्याची भरपाई या संघाने आता आयसीसी कसोटी विश्वचषक स्पर्धा जिंकून केली. भारतीय संघ मात्र या दोन्ही स्पर्धांमध्ये केवळ पराभवाचाच धनी ठरला. 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडने धोबीपछाड दिला होता. आता 2 वर्षानंतर कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही भारताला न्यूझीलंडनेच अस्मान दाखवले आहे.
2 वर्षात कमावलेले 6 दिवसात घालवले!
वास्तविक, या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी बऱयाच मालिका गाजवल्या. अगदी इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारख्या संघांना त्यांच्या भूमीत धूळ चारण्याचा पराक्रम प्रत्यक्षात साकारला. मागील 2 वर्षातील भारताचा फॉर्म निव्वळ लक्षवेधी होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध राखीव 6 व्या दिवसापर्यंत चाललेल्या अंतिम लढतीत मात्र विराटसेनेची अगदीच निराशा केली व यामुळे जे 2 वर्षात कमावले होते, त्याचे अवघ्या 6 दिवसात मातीमोल झाल्याचे स्पष्ट झाले.