भाजप जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांचे नितीन गडकरी यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलच्या लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल उभा करावा तसेच कागल एसटी स्टॅन्ड जवळील उड्डाणपूल मोठा करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजप जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव- सावंतवाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गासह बेळगाव वेंगुर्ले या महामार्गाच्या रूंदीकरणाचे कामही विचाराधीन घ्यावे. अशी विनंतीही केली आहे.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, साखर कारखाने व अनेक छोटे-मोठे प्रकल्प यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघाताचे प्रसंग उद्भवत असतात. तेव्हा या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर कागल शहरातील एस.टी.बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेल्या पुलाचा विस्तार करणेही गरजेचे आहे. तरी महामार्गाचे सहापदरीकरणावेळी या दोन्ही कामांचा विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.