स्वतःला मुल होत नसल्याच्या नैराश्यातून मित्राच्या मुलाचा बळी : नरबळीचा संशय
सोनाळीतील वरदचे सावर्डे बुद्रुक येथून अपहरण : शेतवडीत सापडला मृतदेह : संशयितास अटक
प्रतिनिधी / सावर्डे बुद्रुक
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वरद रवींद्र पाटील (वय 7 रा. सोनाळी ता. कागल) या बालकाचा मृतदेह सावर्डे बुद्रुक परिसरात शुक्रवारी सकाळी सापडला. स्वतःला पंधरा वर्षापासून मुल होत नसल्याच्या नैराश्यातून वरदच्या वडीलांचा मित्र दतात्रय उर्फ मारूती तुकाराम वैद्य (वय 45, रा. सोनाळी, ता. कागल) याने हा खून केल्याची कबुली दिली. हा प्रकार नरबळी असल्याचा संशय व्यक्त झाल्याने जिल्हा हादरला आहे.
दरम्यान, सोनाळीतील वरद 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजल्यापासून सावर्डे बुद्रुक या आपल्या आजोळातून बेपत्ता झाला होता. त्याच्या वडीलांनी मुरगूड पोलिसात मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक परिसरातील ‘खुळा पिपळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदा जाधव यांच्या शेतात शुक्रवारी वरदाचा मृतदेह सापडला. आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
वरद हा सावर्डे बुद्रुक येथून सायंकाळी वास्तुशांती कार्यक्रमात जेवल्यावर बाहेर गेला तो उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू केली. परंतु सापडला नाही. बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत मुरगूड पोलीस, व्हाईट आर्मी आणि शेकडो ग्रामस्थांनी परिसरात शोधाशोध केली. गुरुवारी दिवसभरातही रेस्क्यू फोर्सच्या टीमने व मुरगूड पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजसह शेजारच्या गावातील जंगल भाग पिंजून काढला. सावर्डे बुद्रुकसह शेजारच्या पिंपळगाव बुद्रुक, सोनाळी, पिराचीवाडी, सावर्डे खुर्द गावातील विहिरी, ओढे, नाले यामध्ये वरदची शोधाशोध केली होती. पण त्याचा शोध लागला नव्हता. अखेर शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
ज्या दिवशी संशयिताने वरदचे अपहरण केले, त्याच दिवशी त्याचा खून केला आहे. संशयित मारुती वैद्य हा वास्तुशांती कार्यक्रमालाही हजर होता. तेथूनच तो बाहेर पडला. सावर्डे बुद्रुक हे वरदचे जसे आजोळ आहे तसे मारुती वैद्य याची सासुरवाडीही आहे. वरद गायब झाल्यानंतर अर्ध्या तासातच घामाने डबडबलेल्या अवस्थेत मारूती पुन्हा लोकांच्यात मिसळला. त्याला काही लोकांनी घामाने भिजण्याचे कारण विचारले तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरीही गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्याने आपल्या हातून कुठलेही कृत्य घडले नसल्याचे वारंवार सांगितले. मध्यरात्री पोलिसांनीही त्याला झोपेतून उठूवून वरद कुठे आहे? असे विचारले मात्र त्याने नाचाच पाढा गिरवला होता.
संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दतात्रय उर्फ मारूती वैद्य याने खुनाची कबुली दिली असून स्वतःला पंधरा वर्षापासून मुल होत नव्हते. त्यातून त्याला नैराश्यही आले होते. मुल होण्यासाठी तो अनेक उपासतपास करत होता. त्यातूनच हा नरबळी दिला असावा असा संशय नागरिकांना आहे. दरम्यान, पोलीस संशयीतकडे कसून चौकशी करत असून नेमका खून कशासाठी केला याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. दिवसभरात घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उप अधिक्षक आर. आर. पाटील यांच्यासह पालिसांच मोठा फौजफाटा होता. पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विश्वासघात केल्याने नागरिकांत प्रचंड संताप
बेपत्ता वरदचा खून झाल्याचे समजताच परिसरातील गावांतून शेकडो ग्रामस्थंनी घटनास्थळी धाव घेतली. संतापाने नागरिक बेभान झाले होते. हा प्रकार नरबळीच असावा अशी चर्चा ग्रामस्थांत होती. त्याला पुष्टी देणाऱ्या अनेक घटना घडल्या असल्याचे काही जणांनी सांगितले. घरातच रोज येणारा माणूस, स्वतः वारकरी संप्रदायाचा असणारा, देवस्थानच्या परिसरात राहणारा, वरदच्या लहान भावाला नेहमी खेळवणारा आणि त्याच्या वडीलांचा मित्र असणारा मारूती यानेच विश्वासघात केल्याने नागरिकांत प्रचंड संताप आहे. यावेळी वरदच्या आई-वडीलांसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने संपुर्ण परिसर गहिवरला.
डोक्यात दगड घातला
दगड डोक्यात घालून वरदचा निघृण खून केला आहे. मैत्रीच्या नात्याने वरदच्या वडिलांना आपण निपुत्रिक असल्याचे दुःख मारूती वारंवार सांगत होता. त्यामुळे आपण लवकरच धार्मिक विधीही करणार असल्याचे तो बोलत होता. मला पंधरा वर्षे मूल होत नाही. अनेक दवाखाने बघितले. बऱ्याच भोंदुबाबाकडेही जाऊन आल्याचे तो सांगायचा. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्या माणसांने आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्मृतीदिनादिवशीच अशी घटना घडावी, हे दुदैव म्हणवे लागेल.