कागल / प्रतिनिधी
कागल तालुक्यात कोरोनाचा वाढत चालला आहे. तालुक्यात अकराशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुर्देवाने अनेक जण मृत्यू पावले आहेत. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखायचा असेल तर कोरोनाची ही साखळी तोडण्याची गरज आहे. त्यासाठी जनता कर्फ्यू करावा अशी मागणी होत होती. आज झालेल्या आढावा बैठकीत कागल तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवार ता. ६ ते मंगळवार ता. १५ सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये कागल तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.
येथील डी.आर. माने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाचा कहर सध्या वाढत चाललेला आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी होत होती. सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. पूर्वजांचे स्मरण करण्याचे हे दिवस आहेत. कर्फ्यू काळात घरात राहून पूर्वजांचे स्मरण करूया. या काळात दूध, औषधे आणि कृषी सेवा केंद्र चालू राहतील. बँका बंद राहतील व एटीएम सुरू राहतील. तसेच सरकारी निमसरकारी व खासगी कंपनीमध्ये जाणारे नोकर आपले ओळखपत्र दाखवून जाऊ शकतील. मास्क मात्र सर्वांना बंधनकारकच आहे. मास्क न लावणाऱ्यांना पोलीसांनी पोलीस खाक्या दाखवावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लोकांनी यासाठी सहकार्य करावे व घरात राहून साखळी तोडून दाखवावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात कोविड रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. खासगी डॉक्टर हे रूग्णालय चालवणार असून नाममात्र फी आकारणी करून कोरोना रूग्णांवर उपचार करण्याची सोय याठिकाणी उपलब्ध केली जाईल. उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या सीएसआर फंडडातून निधी उपलब्ध करून त्याचावापर या रूग्णालयासाठी केला जाईल, असे नामदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले .
बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, संजय गायकवाड, आरोग्य निरीक्षक अभिजित गोरे, कृषी अधिकारी आप्पासाहेब माळी, बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. बी. शिंदे, रमेश माळी, प्रविण काळबर, नितीन दिंडे, विवेक लोटे, अॅड . संग्राम गुरव आदी उपस्थित होते.