पाच मेंढरं जखमी तर सहा बेपत्ता
कागल / प्रतिनिधी
कागल एमआयडीसी रोडवरील मेंढपाळ संजय खानू शेळके, गंगाराम हरिबा गोरडे रा.कागल या मेंढपाळांची मेंढरे कागल येथील चंद्रकांत राऊ गुरव यांच्या शेतात चार पाच दिवसापासून खतासाठी बसायला आहेत. सोमवारी सकाळी पहाटे चारच्या दरम्यान तरस सदृष्य प्राण्याने हल्ला केला . या हल्ल्यात संजय शेळके यांची ५ मेंढरे ठार २ बेपत्ता तर ३जखमी झाली आहेत. तर गंगाराम हरिबा गोरडे यांची ५ मेंढरे ठार, ३ बेपत्ता तर दोन गंभीर जखमी आहेत. हा हल्ला साधारण पहाटे चार वाजता पाऊस आणि विजेचा कडकडाट होत होता. अशा वातावरणात तरस प्राण्याने हल्ला केला या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे अडीच तीन लाख रुपये नुकसान झाले आहे.
सदर घटना यशवंत क्रांती संघटनेचे तालुका तालुका संदीप हजारे यांना समजतात त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली. संजय वाघमोडे यांनी वन अधिकारी व वैद्यकीय पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून सर्व अधिकारी यांच्या समवेत घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सदर घटनेचा रीतसर पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती केली. घटनास्थळी पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. घनवट तसेच वनपाल करवीर विजय पाटील, रुपेश मुलानी, वनरक्षक बाबासो जगदाळे, गजानन मगदूम, वनसेवक यांनी घटनास्थळी येऊन रीतसर पंचनामा केला.
यावेळी बोलताना संजय वाघमोडे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण अलीकडे वाढलेले आहे. या प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करून सदर मेंढपाळांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. हल्ली मिळणारी नुकसान भरपाई ही बाजारभावापेक्षा खूपच कमी असल्याने शासनाने हल्लीच्या बाजारभावाप्रमाणे मेंढपाळांना नुकसान भरपाई द्यावी तसेच बेपत्ता बकरी किंवा वन्यप्राणी बकरी सोबत घेऊन जातात किंवा पूर्ण खाऊन टाकतात अशा बकऱ्यांचा पंचनामा करताना वन विभाग व डॉक्टर यांना मृत बकरी पंचनाम्यासाठी अवशेष लागतात. ज्यावेळी एखादा वन्यप्राणी बकरी घेऊन जातो किंवा पूर्ण खातो अशावेळी अवशेष न मिळाल्याने वन विभाग व पशुसंवर्धन विभाग पंचनाम्यात अशा बकऱ्यांची नोंद करीत नाही. त्यामुळे मेंढपाळ यांचे नुकसान होते. तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन बेपत्ता बकऱ्यांची ही मेंढपाळांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. या वेळी घटनास्थळी अमोल मेटकर,आदींसह यशवत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.