वाहनधारकांची कसून चौकशी
कागल / प्रतिनिधी
कोरोना ओमिक्रॉनच्या धास्तीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिलेल्या आदेशानंतर कर्नाटकसह इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे. नसेल तर वाहने परत पाठवली जात आहेत. येथील राष्ट्रीय महामार्गावर सीमा तपासणी नाक्यावर बुधवारपासून कडक तपासणी सुरु करण्यात आली आहे.
सीमा तपासणी नाक्यावर सकाळपासून राज्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेत एमआयडीसी कामगार, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, उपचारासाठी जाणारे नागरिक यांना चौकशी करून योग्य कारण असले तर सोडले जात आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या वाहनधारकांकडे आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा दोन घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास प्रवेश दिला जात आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सहा राज्यातील लोक ये -जा करीत असतात.
दोन पोलीस अधिकारी व ३० कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. दोन शिप्टमधे हे कर्मचारी काम करणार आहेत. दुचाकी धारकांना ओळखपत्र व मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. मालवाहू वाहनांना थेट प्रदेश दिला जात आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे आढळून आली नाहीत त्यांना परत पाठवण्यात येत होते. हा तपासणी नाका आता २४ तास सुरु राहणार आहे. कोल्हापूर शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी या तपासणी नाक्याला बुधवारी सकाळी भेट देऊन येथील पाहणी केली. पोलीस कर्मचाऱ्यांना कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी त्यावेळी दिले आहेत.