प्रतिनिधी / कागल
लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले नेहमीप्रमाणे न येता ती चुकीच्या पध्दतीने काढली आहेत. त्यामुळे बीले मागील बिलाप्रमाणे दुरुस्त करून द्यावीत. तसेच तीन महिन्याचे बील माफ करून मिळावे, या मागणीसाठी येथील महावितरण कार्यालयावर गोसावीवाडी, वड्डवाडी, झोपडपट्टी भागातील नागरिकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणचे उपअभियंता गणेश पोवार यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आमच्या भागातील नागरिक संपूर्णतः मजुर, कष्टकरी वर्गातील आहेत. आशिक्षित आहेत. याचाच फायदा महावितरण कार्यालयाने घेतला आहे. बिले तयार करताना कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे चुकीची बिले दुरूस्त करून मिळावीत. तसेच लॉकडावऊनच्या काळात काम नसल्याने वाढीव बिले भरू शकत नाही.
तीन माहिन्याचे बिल माफ करावे, ० ते १०० युनिटसाठी ३.४६ रू. प्रमाणे वीज बिलची आकारणी करावी, सर्व नागरिकांची बिले दुरुस्त करुन मिळावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर भाजपा कागल शहर कार्याध्यक्षा संगिता पवार, शंकर पवार, सुलाबाई कुराडे, सुनंदा पोवार, लक्ष्मी धोत्रे, यांच्या ह्या आहेत. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही निवेदन
दरम्यान वाढीव वीज बिलाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन काळातील आलेली बिले सर्वसामान्य जनतेला पऱवडणारी नाहीत. नागरिकांना समान हप्ते व्याज न आकारता द्यावेत अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे सागर कोंडेकर, बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, अविनाश मगदूम, प्रभू भोजे आदींच्या सह्या आहेत.
यावेळी महावितरणचे उपअभियंता गणेश पोवार म्हणाले, मीटरप्रमाणे बीले नसतील तर ती दुरुस्त करून दिली जातील. तसेच लॉकडाऊन काळातील बिले ग्राहकांच्या सोयीप्रमाणे भरण्याची मुभा देवू. ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याचे निरसन करणेसाठी महावितरण उपकेंद्रात व्यवस्था करू.