प्रतिनिधी/ कागवाड
कागवाड मतदारसंघात 22 ग्राम पंचायतींमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आले असून गावातील सत्ता पुन्हा एकदा काबीज केली आहे. भाजपचे मुख्य ध्येय गावचा विकास असून मतदारांनीही भाजप पुरस्कृत उमेदवारांना निवडून देत विकासालाच मत दिल्याचे यावरून समजते, असे मत वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. उगार बुद्रुक येथील भाजप पुरस्कृत 26 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. याचप्रमाणे कुसनाळ, मोळे, मंगसुळी, शिरगुप्पी, केंपवाड, मदभावी, जुगूळ यासह 22 गावातून भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. कागवाड येथे नूतन ग्राम पंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विकासकामे प्रलंबित आहेत. आपण निवडून आल्यानंतर प्रथमत: या गावातील विकासकामे हाती घेऊन राज्यात आदर्श मतदारसंघ बनवण्याचा विडा उचलला आहे. यापुढील अडीच वर्षात आपण रात्रंदिवस प्रयत्न करून कागवाडला आदर्श मतदारसंघ बनणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नूतन ग्राम पंचायत सदस्यांसह अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शीतल पाटील, गावप्रमुख जयपाल यरंडोळे, मोळे गावप्रमुख संजय तेलसंग, पेंपवाड गावप्रमुख सुरेश तेली, विनायक शिंदे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.