आमदार सुदिन ढवळीकर यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
प्रतिनिधी /पणजी
खुद्द स्वतःच्या मतदारसंघातील बसस्थानक कित्येक वर्षांपासून पूर्ण न करू शकणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱयावर टीका करताना स्वतः काचेच्या घरात बसलेलो आहे, याची जाणीव ठेवावी. तसेच 2017 नंतर या सरकारने कोणते प्रकल्प आणले ते दाखवून द्यावे, अन्यथा आमच्या कारकीर्दीत पूर्ण झालेले असंख्य प्रकल्प दाखवतो, असे जाहीर आव्हान माजी साबांखा मंत्री तथा विद्यमान आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे. असा मुख्यमंत्री राज्याचा विकास कसा करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सरकारने स्वतः एकसुद्धा नवीन प्रकल्प आणलेला नाही. केवळ कोनशिला बसविल्या आहेत, आणि आरोप मात्र आमच्यावर करत आहे, असे सांगून मुख्यमंत्री करत असलेल्या आरोपांबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
सरकार आजही कंत्राटदारांना 350 कोटी रुपये देणे आहे. कर्मचाऱयांचे पगार घालण्यासाठी दरमहा शंभर, दोनशे कोटींचे कर्जरोखे विक्री करण्याची पाळी या सरकारवर आलेली आहे. या सरकारने एकतर नव्याने एकही प्रकल्प आणलेला नाही, आणि जे प्रकल्प मार्गी लावले त्यातील कित्येक सध्या अपूर्ण स्थितीत आहेत, ते कधी आणि कसे पूर्ण होतील याची सुद्धा शाश्वती नाही. अशावेळी जेथे जाईल तेथे शेकडो कोटींचे प्रकल्प जाहीर करून मुख्यमंत्री तेथील लोकांची दिशाभूल करत आहेत. या सरकारकडे पैसेच नाहीत आणि मोठमोठी आश्वासने देऊन लोकांच्या भावनांशी खेळत आहे. निवडणूक स्टंट करून मतदारांची फसवणूक करत आहे, असा आरोप ढवळीकर यांनी केला.
16 घनमीटर मोफत पाणी देण्याची योजना म्हणजे मोठे गौडबंगाल आहे. योजना लागू करताना कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ गोरगरीब सर्वसामान्य जनतेला होणारच नाही. मोठमोठय़ा गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या आणि त्यातील बहुतेक फ्लॅट बंदावस्थेत असलेल्या उच्चभ्रू व श्रीमंत लोकच तिचा जास्त फायदा घेतील व त्यांच्यावर उपकार करण्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली.
जुलै महिन्यात आलेल्या महापूरात घरे कोसळलेल्या गरीबांना मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. अनेकांना मंजुरीपत्रेही दिली. परंतु दीड महिना उलटला तरी अनेकांच्या खात्यात पैसेच आलेले नाहीत. कित्येक मतदारसंघात लोक आजही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या त्या लोकांची परिस्थिती बिकट झाली असून धड सरकारही बांधून देत नाही आणि रोटरीही पुढाकार घेत नाही, अशी अवस्था झाली आहे. अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळात नुकसानी झालेल्यांचीही झाली आहे. त्यांनाही कोणतीही मदत मिळालेली नाही, असे ढवळीकर यांनी सांगितले. अशा लोकांच्या भावनांशी खेळणे हे पाप असून सरकार त्या पापाचे वाटेकरी बनत आहे, असेही ते म्हणाले.
अशाप्रकारे लोकांना फसवून आपण पुन्हा सत्तास्थानी येणार याची स्वप्ने सरकारने पाहू नये. परिस्थिती अशीच राहिल्यास गत निवडणुकीत जे केवळ 13 आमदार विजयी झाले होते, त्यांची संख्या आणखीही खाली जाऊन एकअंकी होईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, कित्येक प्रकल्प जे 20 कोटी खर्चात होऊ शकतील त्यासाठी 30 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी अनेक उदाहरणे असून त्यांचा लवकरच भांडाफोड करणार असे, ढवळीकर यांनी सांगितले.