उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अळसांदे, नारळालाही सूचविली आधारभूत किंमत
प्रतिनिधी / पणजी
काजूला 125 रुपये आधारभूत किंमत द्यावी अशी मागणी कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केली आहे. त्यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले आहे.
कवळेकर यांनी काल गुरुवारी आल्तिनो निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. काजू बरोबरच नारळाला 12 रुपये, अळसांद्याला 100 रुपये आधारभूत किंमत द्यावी, असेही त्यांनी सूचविले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वतः मान्यता दिली असून, ही फाईल पुढे वित्त विभागाला पाठविली आहे.
ऐन हंगामात आजपर्यंत काजूला कधीच 100 पेक्षा कमी दर मिळाला नव्हता. काजू हे गोमंतकीय नगदी पीक असून, प्रत्येक शेतकरी आपल्या पुढील वर्षाच्या खर्चासाठी या पैशांवरच अवलंबून असतो. त्यातूनच घरातील एखादे लग्नकार्यासुद्धा उरकून घेतले जायचे. त्याशिवाय धार्मिक आदी कार्यासाठीही हे शेतकरी याच पैशांवर अवलंबून असतात.
यंदा ऐन हंगामात करोनामुळे लॉकडाऊन झाले. त्याचा परिणाम म्हणून काजू उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱयांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कृषी खात्याने काजू, नारळ आणि अळसांदे या तीन पिकांच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.
खलाशांच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा
खलाशांना परत आणण्याच्या दृष्टीनेही कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. विशेषतः सालसेत, केपे, काणकोण व सांगे भागातील मोठय़ा प्रमाणात खलाशी विदेशात आहेत. त्यांचे पालक व कुटुंबीय सध्या चिंतातूर बनले असून ते सतत फोनद्वारे आपल्याशी संपर्क करत होते. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यामुळे त्यांना धीर देणे शक्य झाले असे कवळेकर म्हणाले. दरम्यान, विविध किनारी भागातील पंचतारांकित हॉटेल्स क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरता येतील, असे आपण मुख्यमंत्र्यांना सुचविले असल्याचेही कवळेकर यांनी सांगितले.