प्रतिनिधी / कणकवली:
यावर्षी काजूला सुरूवातीच्या कालावधीत प्रतिकिलो 150 रुपयांपर्यंत भाव देण्यात आला होता. मात्र, काजू बीची आवक वाढत चालल्याचे दिसून येताच दरामध्ये मोठी घट होत आहे. आता 115 रुपये किलोपर्यंत काजूचा दर आला असून हा दर 100 रु. च्या खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे काजू बागायतदार अडचणीत सापडले असून शासनाने काजूसाठी हमीभाव जाहीर करण्याची मागणी होत आहे.
यावर्षी जानेवारी अखेर ते फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला काजूचा दर 150 रुपये प्रतिकिलो एवढा होता. दर कमी झाला तरीही 125 रुपयांपर्यंत स्थिर राहील, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यानंतर प्रत्येक आठवडय़ाला काजूचा दर घसरत गेला.
सध्या बाजारात काजूची आवक वाढलेली असून दर आणखीच कमी होताना दिसत आहे. मंगळवारी काजूचा दर 120 रुपये प्रतिकिलो होता. हाच दर गुरूवारी 115 रुपयांपर्यंत आला. पुढील एक दोन आठवडय़ात काजूचा दर 100 किंवा त्यापेक्षा कमी होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे काजू बागायतदार अडचणीत सापडले आहेत. शासनाने या काजू बीच्या हमीभावाबाबत धोरण ठरवून शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.