प्रतिनिधी/ मडगाव
काजूचा दर कोणी ठरावावा व गेल्या दोन वर्षापासून काजूचा दर कोसळल्याने, गोव्यात काजू माफिया तयार झालेत का ? या मुद्दावरून सद्या दक्षिण गोव्यात माजी मंत्री रमेश तवडकर व कृषी पणन मंडळाचे चेअरमन प्रकाश शंकर वेळीप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर काल मंगळूरच्या आचल काजू कंपनीचे सीईओ गिरीधर प्रभू यांनी पत्रकार परिषद घेऊन काजू शेतकऱयांना मदत करणारी व्यक्ती किंवा संस्था ही माफीया होत नसल्याचे सांगितले. त्याच बरोबर गोव्यातील काजूला चांगला दर दिला जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
गिरीधर प्रभू पुढे म्हणाले की, आदर्श कृषी संस्था शेतकरांच्या हितासाठी सुरु करण्यात आलेली आहे. आज आदर्श कृषी संस्थेवर नको असलेले आरोप करुन शेतकऱयांना फसविण्याचे काम होत आहे. शेतकऱयांना आम्ही कधीही कमी प्रमाणात काजूचा दर दिलेला नाही. जो दर बाजारात आहे, त्याच दराने शेतकाऱयांकडून काजू खरेदी केला जातो. इतर राज्याच्या तुलनेत काजू उत्पादन घेणाऱया शेतकाऱयांना 20 रु. अधिक दराने काजू खरेदी केला जातो.
माजी कृषीमंत्री रमेश तवडकर यांनी मडगावात पत्रकार परिषद घेऊन राज्यात काजू माफीया तयार झाल्याचा आरोप केल्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्याकरिता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदर्श कृषी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप व सतीश वेळीप उपस्थित होते.
आदर्श कृषी संस्था शेतकाऱयांना जे काही खरेदी करते त्याची संपूर्ण माहिती देते. तेव्हा शेतकाऱयांची सेवा करणाऱयांना आज माफिया म्हटले जाते. अशांना शेतकाऱयांनीच उत्तर देणे योग्य ठरेल. गोव्यातील काजू हा सेंद्रिय असल्याने त्याला चांगला भाव मिळावा यासाठी आमचाही प्रयत्न आहे. तसेच आम्ही काजुचे दर ठरवत नाही. त्यामुळे इतरांनी आमच्यावर बोट दाखवू नये. गोव्यातील जमीन काजूसाठी चांगली असून त्यामुळे शेतकाऱयांनी आपल्या काजूचे उत्पन वाढविण्याचे प्रयत्न केले पहिजे असे प्रभू पुढे बोलताना म्हणाले.
देशात आज ‘ओडिसा’ राज्यात काजूचे सर्वांधिक पीक घेतले जाते. काजू उत्पादनासंदर्भात हे राज्य खुपच जोमाने काम करीत आहे. ओडिसा नंतर महाराष्ट्र. कर्नाटक, गुजरात व त्रिपुरामध्ये काजूचे पीक घेतले जात असले तरी गोव्याच्या काजूची चव अन्य काजूमध्ये नसल्याची माहिती श्री. प्रभू यांनी दिली.
गोव्यात 1993 साली काजूचा दर प्रति किलो 22 रूपये होता. त्यानंतर तो कधी उतरला तर कधी वाढला. मात्र, 2018 मध्ये काजूला सर्वाधिक म्हणजे 165 रूपये प्रतिकिलो असा दर मिळाला. गेल्या वर्षी सुरवातीला तो 148 रूपये व नंतर जून महिन्यात 122 रूपयावर पोचला होता. काजूचा दर कोसळल्यानेच रमेश तवडकर यांनी काजूचा दर कोण निश्चित करतो व दर कोसळण्यामागे काजू माफिया आहेत का ? असा सवाल उपस्थित केला होता.