बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून काडा कार्यालयासमोर गोंधळ सुरूच आहे. किट मिळणार या आशेपोटी पहाटेपासूनच लांबच्यालांब रांगा लावण्यात येत आहेत. कोण किट वाटणार आहे याची माहितीही नागरिकांना नसते. तरीदेखील त्या कार्यालयासमोर रांगा लागत आहेत. बऱयाच दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे यामध्ये कोणते राजकारण रंगले आहे? याचीच चर्चा सुरू आहे.
आठ दिवसांपूर्वी काडा कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी किट वाटणार म्हणून रांगा लावल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र याबाबत सुरेश अंगडी यांना कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळे उपस्थितांना माघारी पाठविण्यात आले. गुरुवारी काडा कार्यालयासमोर काही जणांना किटचे वाटप करण्यात आले. मात्र पुन्हा शुक्रवारीही कीटचे वितरण करण्यात येणार असल्याचे समजल्याने मोठी गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी या सर्वांना पिटाळले. त्यानंतर महिला व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. हातामध्ये आधारकार्ड घेऊन आम्हाला किट द्या, अशी मागणी त्या महिला करत होत्या. मात्र किट देणार कोण, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. खासबाग, शहापूर परिसरातील विणकर समाजातील महिलांचा आणि नागरिकांचा यामध्ये मोठय़ा प्रमाणात समावेश होता.