गाळ उपसण्याची मागणी, महापुरानंतर तज्ञांनी दिलेल्या अहवालात केली होती सूचना
प्रतिनिधी/काणकोण
काणकोणात पावसाची रिपरिप चालूच असून मागच्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे या तालुक्यात आता एकूण 171 इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे या तालुक्यातील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून तळपण आणि गालजीबाग या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे. पैंगीण येथील गालजीबाग नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतीमध्ये तुडुंब पाणी भरल्यामुळे नदी आणि शेती एक झाली आहे.
यंदाच्या हंगामात महालवाडा येथील हादी ओहोळ रस्त्यावरून सहा वेळा पाणी गेले आहे. असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. शेती पाण्याने तुडुंब भरल्यामुळे शेतीच्या बाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. साधारणपणे जून, जुलै महिन्यात पडणाऱया पावसाच्या वेळी हादी ओहोळ रस्त्यावरून एखाद-दुसऱयांदा पाणी जायचे. हल्लीच्या काळात थोडासा जरी पाऊस पडला, तरी पाणी साचण्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे.
गाळ उपसण्याची गरज
गालजीबाग व तळपण या दोन्ही नद्यांत मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्यामुळे पात्रे उथळ झाली आहेत. नद्यांचा काठ दाट झाडींनी व्यापला आहे. यापूर्वी विशेषता गालजीबाग नदीच्या काठाच्या दोन्ही बाजूला शेती केली जायची. त्यावेळी नदीवर बांध घालून पाणी अडविले जायचे. नदीची पात्रे खोल आणि रूंद केली जायची. त्यामुळे शेतीत पाणी शिरण्याचे प्रकार कमी असायचे. या भागातील भातशेती पूर्ण बंद झालेली आहे. नदीची पात्रे बुजली आहेत. त्यामुळे नदीचे पाणी नदीतून न वाहता सरळ शेतीत आणि काठावरील बागायतींमध्ये घुसते, अशा प्रतिक्रिया जाणत्या लोकांनी व्यक्त केल्या.
सूचनेकडे दुर्लक्ष
गालजीबाग नदी मार्ली-तिर्वाळहून, तर तळपण नदी कुसके येथून सुरू होत असते. हा संपूर्ण परिसर गाळाने साचला असून नदी दिवसेंदिवस छोटी होत चालली आहे. 2009 साली ज्यावेळी काणकोण तालुक्यात महापूर आला होता त्यावेळी नदीची पात्रे बुजल्यामुळे काठावरील घरांमध्ये पाणी घुसले असा अहवाल पर्यावरणतज्ञांनी दिला होता आणि नदीतील गाळ उपसण्याची सूचना दिली होती. परंतु मागच्या 11 वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत. जलस्त्रोतखाते याबाबतीत पूर्ण दुर्लक्ष करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाच याचा परिणाम काठावरील लोकांना भोगावा लागत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पालिका क्षेत्रातील पणसुले रस्ता आणि चावडीवरील सेंट तेरेझा चर्चच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या घरांना धोका निर्माण होत असल्याच्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आहेत. रस्त्याच्या बाजूची गटारे बुजल्याने आणि बहुतेकांनी आपल्या कक्षेतील पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत.