प्रतिनिधी/ काणकोण
कृषिप्रधान तालुका असलेल्या काणकोणात भटक्या जनावरांची समस्या दिवसेंदिवस जटील आणि वाढती डोकेदुखी बनत चालली असून दिवसाकाठी एक-दोन जनावरांचे रस्त्यावर बळी जाण्याच्या घटना वाढायला लागल्या आहेत. यापूर्वी गुळे ते माशेपर्यंतच्या रस्त्यावरच सर्वत्र भटक्या जनावरांचा संचार व्हायचा. आता मात्र याच जनावरांनी गुळे ते माशेपर्यंतचा बगलमार्ग धरला आहे.
हा बगलमार्ग वाहतुकीला खुला झाल्यानंतर दक्षिण भारतातील विविध राज्यांतून येणारी मालवाहू वाहने आणि अन्य वाहने या मार्गावरून वळविण्यात आली. दररोज शेकडो वाहने या मार्गावरून ये-जा करत असतात. या रस्त्याच्या मधोमध रवंथ करत बसणारी भटकी गुरे विशेषता रात्रीच्या वेळी हकनाक बळी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. निदान या मार्गावर तरी भटकी गुरे येणार नाहीत यासाठी संरक्षक कठडे उभारावेत या मागणीला आता जोर चढला आहे.
सद्यपरिस्थितीत मोखर्ड, पर्तगाळी, गिमणे, पैंगीण बाजार, माशे ते माड्डीतळप परिसरांत 200 पेक्षा जास्त भटकी गुरे रस्ता अडवून बसलेली दिसतात. या परिसरांतील कृषी व्यवसाय पूर्ण थंडावला आहे. त्यामुळे या जनावरांना कोणीच वाली नाही की काय अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. ही जनावरे मात्र अपघातांना आमंत्रण देऊन हकनाक बळी जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.