उद्या मार्केटातही जागा मागण्याचा धोका, मूळचे विक्रेते अडचणीत येण्याची शक्यता
प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर चावडीवरील मासळी आणि भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले. मात्र लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यानंतर ज्यावेळी भाजीपाला विकायला परवानगी देण्यात आली तेव्हापासून चावडीवरील भाजी मार्केटातील अधिकृत विक्रेते वगळता भलत्याच व्यक्ती या ठिकाणी व्यवहार करत असून हा सगळा व्यवहार कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा सवाल आता जो तो करायला लागला आहे. उद्या हे लोक भाजी मार्केटात आपल्याला जागा हवी म्हणून हट्ट धरायला लागले, तर मूळ विक्रेत्यांनी कोठे जायचे अशा प्रतिक्रियाही या भागातून आता व्यक्त व्हायला लागल्या आहेत.
पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये नियमित भाजीविक्री करणारे साधारणपणे 30 जण आहेत. त्यातील काही जणांची अधिकृत नोंदणी आहे. तर काही जण कधी तरी येतात आणि विक्री करतात. पैंगीण, लोलये, खोतीगाव, गावडोंगरी, बार्से या भागांतून येणाऱया भाजीविक्रेत्या महिला वाहतुकीची नीट सोय नसल्यामुळे या ठिकाणी येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत यापूर्वी जे लोक केवळ फळांची विक्री करत होते त्यातील काही जण भाजी आणि मासेविक्री करायला लागले आहेत. पालिकेचे मासळी मार्केट मागच्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यक्ती वाहनातून मासेविक्री करायला लागल्या आहेत. या विक्रेत्यांनी पुढे मासळी मार्केटमध्ये जागा मागितली, तर मूळ मासेविक्रेत्या अडचणीत येण्याची शक्यता आता व्यक्त व्हायला लागली आहे.
मूळच्या विक्रेत्यांना भीती
काणकोण पालिकेच्या जुन्या भाजी मार्केट प्रकल्पाला आग लागल्यानंतर तेथील पहिल्या मजल्यावर जे कार्यरत होते त्या सहा जणांना अजूनही पालिकेने जागा दिलेली नाही. तीच परिस्थिती उद्या मूळ मासळीविक्रेत्यांवर आणि भाजीविक्रेत्यांवर जर आली, तर त्यांना न्याय कोण देणार अशी भीती या विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या चावडीवर जे भाजीपाल्याचा व्यवहार करतात ते सर्व जण परप्रांतीय असून या व्यक्तींना ही जागा दिली कोणी आणि याचा गैरफायदा त्या व्यक्ती घेणार नाहीत कशावरून अशी चर्चा आता सर्रास व्हायला लागली आहे.
काणकोण पालिकेने आठवडय़ाचा बाजार जेव्हा सुरू केला तेव्हा तो केवळ फळ-भाज्यांपुरताच मर्यादित होता. नंतर हळूहळू तयार कपडे, विजेचे साहित्य, भांडी, रेनकोट, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू विकायला सुरूवात केली. पालिकेत नियमित परवाना शुल्क आणि अन्य कर भरणारे व्यापारी चावडीवर ज्यांचा व्यवहार करतात त्याच वस्तू आठवडय़ाच्या बाजारात विकायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम चावडीवरील व्यापाऱयांवर झाला. उद्या अशीच परिस्थिती परत निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आताच सावध व्हायला हवे, असे मत चावडीवरील एका व्यापाऱयाने व्यक्त केले.