प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात खरीप पिकाच्या भातशेतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या तालुक्यात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती विशेषतः गुळे, कर्वे, भूपर, बडसरे, अवें-खोतीगाव, पैंगीण, गालजीबाग, पोळे या भागात केली जाते. बैलांचा वापर करून नांगरणी करण्याची जुनी पद्धत आता बहुतेक शेतकऱयांनी सोडून दिली असून पॉवर टिलर, टॅक्टरचा वापर करून नांगरणी आणि पेरणी देखील करण्याचा नवा मार्ग आता शेतकऱयांनी अवलंबिला आहे. पेरणीपेक्षा रोपे तयार करून लावण्याकडे आणि अधिकाधिक पिके घेण्याकडे आता शेतकऱयांचा कल वाढलेला आहे. सध्या कामगार मिळणे कठीण झालेले आहे. ज्या ठिकाणी उपलब्ध होतात त्या ठिकाणी त्यांचा दर परवडत नसल्याची माहिती काही शेतकऱयांनी दिली. कृषिखाते या शेतकऱयांना विविध मार्गांनी सहकार्य करत असल्याची माहिती काणकोणच्या विभागीय कृषी अधिकाऱयांकडून देण्यात आली. पॉवर टिलर, ट्रक्टर खरेदीसाठी सवलत, बियाणी आणि खतासाठी देखील सवलत देऊन शेतकऱयांना उत्तेजन देण्याचे काम कृषी खात्याकडून चालू आहे. त्यामुळे युवावर्ग देखील या क्षेत्रात आता मोठय़ा संख्येने उतरायला लागला आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.