सामाजिक आरोग्य केंद्र सतर्क
प्रतिनिधी /काणकोण
डेंग्यु आणि कोरोनाची लक्षणे सर्वसाधारण एकच असून थंडी, उलटी, ताप या सारखीच लक्षणे दोन्ही रोगांच्या बाबतीत आहेत. त्यामुळे उगीच घाबरण्याची गरज नाही आणि सद्या काणकोण तालुक्यात चालू असलेल्या टीका उत्सवाच्या वेळी जे नागरिक जमतात त्याना आवश्यक असलेली माहिती देऊन डेंग्यू आणि मलेरिया रोगासंबधी जागृती करण्याचे काम काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून चालू असल्याची माहिती काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. वंदना देसाई यानी दिली.
मागच्या जवळ जवळ चार ते पाच महिन्यापासून रजेवर असलेल्या डॉ. देसाई यानी नुकताच आपल्या कामाचा ताबा घेतला आहे. सद्याचा मास हा मलेरिया निमूर्लन म्हणून पाळला जात असून जुलै ते सप्टेंबर पर्यंत डेंग्यू निर्मूलन मास म्हणून पाळण्यात येत असताना प्रत्येक ठिकाणी जाऊन या रोगाची लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी या संबधीची जागृती करण्याचे काम काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून वेळच्या वेळी केले जात असल्याची माहिती काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राचे सेनिटरी निरीक्षक प्रणय नाईक यानी दिली.
मलेरियाचे डास विशेषता स्वच्छ पाण्यात तर हत्तीरोगाचे डास सांडपाण्यात अंडी घालीत असतात. डेंग्युचे डास देखील मोकळय़ा जागी अंडी घालीत असतात. त्यामुळे आपल्या घरासभोवती उघडी प्लास्टिकची भांडी, टायर, नारळाच्या करवंटया सारख्या वस्तू ठेवू नयेत, कोणत्याच ठिकाणी पाणी साचणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते किंवा सांडपाणी साचून राहते. त्या जागा मोकळय़ा कराव्यात असे आवाहन श्री. नाईक यानी केले आहे.
मे महिन्यात काराशिरमळ-आगोंदा येथे आणि त्या ठिकाणाहून अवघ्या एक किमी. अंतरावर असलेल्या एका चहाच्या गाडय़ावर मिळून दोन संशयास्पद असे रूग्ण आढळले. त्यातील एका 15 वर्षाच्या युवतीला कोरोनाची लक्षणे आढळली होती. सदर युवतीचा ताप उतरत नसल्याचे आढळल्या वरून तीला मडगावच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मागाहून सदर युवतीला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले. दोन्ही रोगाची लक्षणे एकच असल्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये आणि लगेच सामाजिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून करण्यात आले आहे. सद्या तरी काणकोण तालुक्यात डेंग्यु किवा मलेरियाचे रूग्ण आढळले नाहीत. ज्या ठिकाणी बांधकामे चालतात, ज्या भागात पर प्रांतिय कामगार वास्तव्याला आहेत. ज्या भागात उघडय़ावर मलमूत्र विसर्जन केले जाते, त्याच प्रमाणे मासळी, भाजी मार्केट, बस स्थानक आणि जन समुदाय ज्या ठिकाणी गर्दी करतो त्या ठिकाणी सामाजिक आरोग्य केंद्राकडून सावधगिरीचा उपाय म्हणून जंतूनाशकाचा फवारा मारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या तालुक्यातील घरोघर जाऊन या रोगा संबधीची माहिती देतानाच सर्वाना जागृत करण्याचे काम या केंद्राकडून करण्यात येत असल्याची माहिती डॉ. देसाई यानी दिली.