पालिका क्षेत्रासह श्रीस्थळ, पैंगीण, खोतीगाव, गावडोंगरी पंचायतींत जोरदार कामगिरी, आदिवासी समाजाचा भक्कम पाठिंबा
प्रतिनिधी /काणकोण
भाजपाच्या कार्यकर्त्यांची शक्ती, संघटन कौशल्य आणि मतदारांचा विश्वास या बळावर काणकोण मतदारसंघात प्रबळ विरोधी गट असताना देखील भाजपाचे उमेदवार आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांनी विजय संपादन केला. निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासून या मतदारसंघात भाजपविरोधी असे वातावरण तयार करण्यात आले होते. भाजपाच्या मंडळ समितीतील काही जण विरोधात गेले होते. काहींनी अपप्रचार केला आणि पहिल्यांदा एकाच वेळी 8 उमेदवार निवडणुकीत उतरले होते. मागची पाच वर्षे प्रत्यक्ष राजकारणापासून अलिप्त असतानाही संयमीपणा आणि विरोधी गटावर टीका न करता त्यांना समंजसपणे हाताळण्याच्या वृत्तीमुळे तवडकर भाजपाचा हा बालेकिल्ला राखतानाच पक्षश्रेष्ठींच्या उमेदवारी देण्याच्या निर्णयाला पात्र ठरले आहेत.
काणकोण मतदारसंघातील एक नगरपालिका आणि सहा पंचायतींचा विचार केल्यास श्रीस्थळ पंचायत वगळता लोलये, पैंगीण, गावडोंगरी, आगोंद, खोतीगाव या पंचायतींमधील अर्ध्यापेक्षा अधिक पंच आणि काणकोण नगरपालिकेतील अर्धे नगरसेवक तवडकर यांच्या विरोधात असताना देखील एकूण 59 बुथांपैकी जवळजवळ 28 बुथांवर त्यांनी मताधिक्य मिळविले. आगोंद पंचायतीमधील 6 पैकी 1, काणकोण नगरपालिकेतील 16 पैकी 9, श्रीस्थळ पंचायतीमधील 6 पैकी 3, पैंगीण पंचायतीमधील 10 पैकी 5, लोलये पंचायतीमधील 7 पैकी 1, खोतीगाव पंचायतीमधील 6 पैकी 5, तर गावडोंगरी पंचायतीमधील 7 पैकी 4 बुथांवर त्यांनी आघाडी घेतली.
आदिवासी समाज तवडकरांच्या पाठिशी
1994 साली पहिल्यांदा ज्यावेळी इजिदोर फर्नांडिस पूर्वीच्या पैंगीण मतदारसंघातून निवडणुकीत उतरले त्यावेळेपासून गावडोंगरी, खोतीगाव, लोलये पंचायतींवर त्यांचा वरचष्मा होता. या तिन्ही पंचायतींमध्ये नेहमीच त्यांनी आघाडी घेतली. एवढेच नव्हे, याच मतदारांच्या भरवशावर ही निवडणूक त्यांनी लढविली होती. मात्र यावेळी त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झालेला असून त्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आल्याचे संकेत या मतदारसंघातील मतदारांनी दिले आहेत. पैंगीण पंचायतीमधील मार्ली, गालजीबाग, सादोळशे या भागांत नेहमीच त्यांनी आघाडी घेतली होती. त्याला खिंडार पाडतानाच यावेळी खोतीगाव, गावडोंगरी, श्रीस्थळचा आदिवासी समाज संघटितपणे तवडकर यांच्या पाठिशी खंबीरपणे राहिला.
ख्रिस्ती समाजाचा काँग्रेस उमेदवाराला कौल
साधारणपणे 4500 इतके मतदार असलेल्या ख्रिस्तीत समाजाने यावेळी वारंवार पक्ष बदलल्याचे कारण पुढे करत फर्नांडिस यांच्याऐवजी काँग्रेसच्या जनार्दन भंडारी यांना कौल दिला. काणकोणच्या ‘चर्च फॅक्टर’ने पहिल्यांदाच फर्नांडिस यांच्या विरोधात प्रचार केला, त्यामुळे एकूण 59 बुथांपैकी केवळ 13 बुथांवर काठावरील मताधिक्य त्यांना प्राप्त झाले. त्यामानाने नवख्या असलेल्या भंडारी यांनी पहिल्याच फेरीत 15 मतदान केंद्रांवर आघाडी घेतली. तर माजी आमदार विजय पै खोत यांना एक-दोन मतदान केंद्रांवरील आघाडीवर समाधान मानावे लागले.
नियोजन, परिश्रम कामी आले
संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम एकत्र आल्यास काय घडू शकते याचे उदाहरण यावेळी तवडकर यांनी दाखवून दिले आहे. या निवडणुकीकडे एक आव्हान म्हणून पाहतानाच केलेले योग्य नियोजन आणि आजवर सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले परिश्रम यावेळी कामाला आले. विविध माध्यमांतून लोकांच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे विरोधकांनी विविध प्रकारच्या क्लृप्त्या जरी वापरल्या असल्या, तरी त्याचा काहीच परिणाम आपल्यावर झाला नाही, असे मत तवडकर व्यक्त करत आहेत.
तवडकर यांना काणकोण पालिका क्षेत्रात 2759, श्रीस्थळ पंचायतीत 1164, पैंगीण पंचायतीत 1379, लोलये पंचायतीत 568, आगोंद पंचायतीत 551, खोतीगाव पंचायतीत 849, तर गावडोंगरी पंचायतीमध्ये 1366 इतकी मते मिळाली. आजवरच्या निवडणुकांत फर्नांडिस यांची मुख्य ताकद राहिलेल्या खोतीगाव पंचायतीत 557, गावडोंगरी पंचायतीत 1208, तर लोलये पंचायतीमध्ये 568 इतकी मते त्यांना मिळाली. लोलये पंचायतीमध्ये फर्नांडिस यांना काठावरचे बहुमत मिळाले. आगोंद पंचायतीमध्ये काँग्रेसच्या भंडारी यांनी मताधिक्य मिळविले. काणकोण मतदारसंघातून एकूण 1162 टपाली मतदान झाले. त्यातील 146 मते बाद झाली. टपाली मतदानातही भाजपाला आघाडी मिळाली. आपण आजवर कसलीच अपेक्षा धरली नाही. पक्षाने जी जबाबदारी सोपविली ती प्रामाणिकपणाने स्वीकारली, असे सांगून यापुढे देखील याच वृत्तीने काम करण्याची तयारी तवडकर यांनी व्यक्त केली आहे.
पै खोत यांचा भ्रमनिरास
या निवडणुकीत काणकोणचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या पै खोत यांचा मात्र पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. मागच्या दोन वर्षांत कोरोना महामारीने ग्रासलेले असताना जर त्यांनी जनतेच्या मदतकार्यास स्वतःला वाहून घेतले असते, तर कदाचित वेगळेच चित्र तयार होताना त्याचा त्यांना निवडणुकीत लाभ झाला असता, अशा प्रतिक्रिया त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्या वेळी काय ते बघू या त्यांच्या वृत्तीमुळे आणि नको त्या व्यक्तींवर ठेवलेल्या विश्वासामुळे मतदारांनी त्यांना चौथ्या स्थानावर नेऊन ठेवतानाच त्यांच्या सर्व आशा-आकांक्षा धुळीला मिळविल्या, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत.
तवडकरांना मंत्रिपदाची मागणी दरम्यान, तवडकर हे चौथ्यांदा निवडून आलेले ज्येष्ठ असे आमदार आहेत. 2012 च्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या सरकारात ते चार प्रमुख खात्यांचे मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत काणकोणात सुरू केलेले रवींद्र भवन, कृषी भवन, काही क्रीडा प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेत असून त्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी त्यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांकडून आता व्हायला लागली आहे.