प्रतिनिधी /काणकोण
गुळे ते पोळेपर्यंतचा महामार्ग वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनलेला आहे. या रस्त्यावर सर्वत्र पडलेल्या खड्डय़ांमुळे या मार्गावरून वाहतूक करणे हा जिवावरचा खेळ झालेला असून काँग्रेस पक्षाने मागच्या कित्येक दिवसांपासून हा प्रश्न लावून धरलेला आहे. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी यासंबंधी चर्चा केली असता सविस्तर उत्तरे दिली जात नाहीत असा दावा करून काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत आणि अन्य कार्यकर्त्यांनी राज्यपालांना यासंबंधीचे निवेदन सादर केले आणि या रस्त्याच्या सुधारणेकडे लक्ष देण्याची मागणी केली.
राज्यपालांना निवेदन देण्यासाठी आलेल्या काणकोण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अडवणूक करण्यात आली. त्यांना ज्या ठिकाणी राज्यपालांची बैठक चालू होती त्या ठिकाणी जायला मनाई केली. अखेर राज्यपाल लोकप्रतिनिधींशी चालू असलेला वार्तालाप संपवून आले त्यावेळी दारातच त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यपालांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, अशी माहिती भगत यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिली.