जागरूक नागरिक संघटनेच्या आवाहनाला उत्स्फूर्त पाठिंबा, भाजी-मासळी मार्केटही बंद
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी काणकोणच्या व्यापाऱयांनी गुरुवार 6 पर्यंत आपला संपूर्ण व्यवहार बंद ठेवावा या काणकोणच्या जागरूक नागरिकांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून सोमवारी व मंगळवारी चावडीवरील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
काणकोणच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन काही काळापुरते कळ सोसण्याचे केलेले आवाहन काणकोणच्या व्यापारी वर्गाने तंतोतत पाळले. मात्र चावडीवरील बागायतदार भवन सोमवारी सकाळी खुले करण्यात आले होते. परंतु नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार ते देखील बंद ठेवण्यात आले. चावडी, चार रस्ता, शेळेर येथील मासेविक्री पूर्णपणे बंद होती. पाळोळे, चार रस्ता, शेळेर येथील संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. एवढेच नव्हे, तर चावडीवरील भाजी मार्केटमध्ये पहिल्यांदाच सर्वत्र शुकशुकाट होता.
चावडीवरील कदंब बसस्थानकावर खासगी बसेस पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. कदंब बसवाहतूक जरी चालू असली, तरी तुरळक प्रवाशांना घेऊन ही बस वाहतूक चालू होती. पैंगीण, भाटपाल, माशे या भागात काही दुकाने सुरुवातीला खुली करण्यात आली. मात्र जागरूक नागरिकांनी केलेल्या आवाहनानुसार या भागातील दुकाने देखील बंद ठेवण्यात आली. तालुक्यातील औषधालये, बँका, पतसंस्था सुरू होत्या. मात्र बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आल्यामुळे आणि मर्यादित स्वरूपातच बससेवा सुरू असेल असे कळविण्यात आल्यामुळे बाजारात नागरिकांची तुरळक अशी उपस्थिती राहिली. काणकोणची पोलीस यंत्रणा या सर्वांवर लक्ष ठेवून होती. सोमवारी सकाळच्या सत्रात काणकोण जागरूक नागरिक संघटनेचे विजय पै खोत, अजय भगत, नंदीप भगत, शांताजी गावकर, शंकर नाईक, नगरसेवक रमाकांत ना. गावकर, धीरज ना. गावकर आणि अन्य नागरिकांनी चावडी, चार रस्ता, पाळोळे, शेळेर भागांचा दौरा करून पाहणी केली आणि व्यापाऱयांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कामगारांची जबाबदारी कोण घेणार ?
दरम्यान, दरवेळी सर्वसामान्य व्यापाऱयांनाच का वेठीस धरले जाते, असा सवाल जो तो आता करायला लागला आहे. मागच्या वर्षी सरकारने ज्या वेळी अधिकृतरीत्या लॉकडाऊन जाहीर केले होते त्यावेळी परप्रांतीय कामगारांसाठी खास आसरास्थळे उभारली होती. या तालुक्यात जेवढे म्हणून परप्रांतीय कामगार कामानिमित्त आलेले आहेत त्यांच्या खाणा-जेवणाची व्यवस्था सरकारने केली होती. काणकोणचा व्यवहार जर एकेक आठवडा बंद झाला, तर या कामगारांना काम कोठून मिळणार आणि त्यांच्या खाणा-जेवणाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल एका सरकारी अधिकाऱयाने अनौपचारिकरीत्या या प्रतिनिधीशी बोलताना केला. स्वेछा लॉकडाऊन केला ही बरीच गोष्ट आहे. परंतु गावांतील लोक घरातून बाहेर पडणार नाहीत याकडे कोण लक्ष देईल, असा सवाल त्यांनी केला. पोलीस आणि सरकारी यंत्रणा देखील हतबल झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कोणत्याही निर्णयाची सक्ती करून काहीच फायदा नाही. प्रत्येक नागरिकाने स्वतःहून लॉकडाऊन व्हायला हवे. तेव्हाच ही साखळी तुटू शकेल. लोलयेच्या व्यापाऱयांनी जनहिताचा विचार करून आपली आस्थापने बंद ठेवून या लॉकडाऊनमध्ये भाग घेतला, अशी प्रतिक्रिया लोलयेचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी व्यक्त केली.
किंदळे परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर
दरम्यान, 3 रोजी किंदळे परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून आतापर्यंत काणकोण तालुक्यात 6 कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी दिली आहे.