नगरसेवक धीरज ना. गावकर यांचा आरोप
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण नगरपालिका मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा बहुतेक नगरसेवकांचा आरोप आहे. दर महिन्याला पालिका क्षेत्रातील विकासकामे आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींवर दीर्घकाळ चर्चा करून जे ठराव घेतले जातात त्या ठरावांची कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु पालिका मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या ठरावांची कार्यवाहीच होत नाही, असा आरोप मास्तीमळ वॉर्डाचे नगरसेवक पांडुरंग उर्फ धीरज ना. गावकर यांनी केला आहे.
20 एप्रिलच्या बैठकीत आपण चावडीवरील मासळी मार्केटची दैनंदिन स्वच्छता राखण्यात यावी, मार्केटच्या बाजूला असलेल्या गटाराची सफाई करण्यात यावी, या ठिकाणचे विक्रेते त्याचप्रमाणे मासळी मार्केटात येणाऱया ग्राहकांसाठी या ठिकाणी शौचालय असायला हवे, हात धुण्यासाठी पाण्याची सोय असायला हवी, मासळी मार्केटमध्ये खडप्पा फरशा बसविण्यात याव्यात, अशा मागण्या केल्या होत्या. या मूलभूत गरजा प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतर मासळी विक्रेत्यांची सोय मासळी मार्केटात करा असा ठराव आपण मांडला होता, याकडे गावकर यांनी लक्ष वेधले. भाजी मार्केटला आग लागल्यानंतर आणि संपूर्ण मार्केट इमारत पाडल्यानंतर ज्या गाळेधारकांचे नुकसान झाले त्यांचे पुनर्वसन नव्या भाजी मार्केटातील रिकाम्या असलेल्या गाळय़ांमध्ये करण्यात यावे यासंबंधी देखील याच बैठकीत ठराव घेण्यात आला होता. यापूर्वीच्या देखील मंडळाने गाळेधारकांच्या पुनर्वसनासंबंधी वारंवार चर्चा केलेली आहे. परंतु सहा महिन्यांपूर्वी घेतलेले हे ठराव कागदोपत्रीच धूळ खात पडले आहेत, असे गावकर म्हणाले. या ठरावांचे पुढे काय झाले याची साधी चौकशी देखील या ठिकाणी केली जात नाही आणि नव्याने घेतलेल्या बैठकीत परत त्याच ठरावांवर चर्चा करण्याची पाळी येते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.