‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या मनोज परब यांचा आरोप, स्थानिकांना संधी देण्याची मागणी
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण नगरपालिकेचे चावडीवरील बाजार संकुल पूर्णपणे परप्रांतियांच्या ताब्यात गेले आहे. 2015 साली या ठिकाणी उभारलेल्या सदर मार्केट इमारतीचा उपयोग स्थानिकांना होणार अशी अपेक्षा बाळगलेल्या स्थानिकांची पूर्णपणे निराशा झालेली आहे, असा स्पष्ट आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी केला आहे.
नुकतीच परब यांनी या मार्केटची पाहणी केली आणि एकंदर प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर माहिती हक्क कायद्याखाली सर्व माहिती गोळा करण्यात येणार असून स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था वेळ पडल्यास आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. या मार्केटमधील पहिल्या मजल्यावर सर्व भिंतींवर परप्रांतियांनी जागा विकत घेतल्याप्रमाणे आपली नावे कोरून ठेवली आहेत. कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. या मार्केटचा लाभ स्थानिकांनाच व्हायला हवा. त्यादृष्टीने विचार झालेला नाही. परप्रांतियांची एक स्वतंत्र लॉबी तयार झालेली असून पैशांच्या जोरावर ती राजकारण्यांना बांधून ठेवत आहे, असा आरोप परब यांनी याप्रसंगी केला.
परप्रांतियांना वेगळा नियम
या मार्केटचा पहिला मजला पूर्णपणे परप्रांतियांच्या ताब्यात गेल्याचे दिसून येते. स्थानिक विक्रेत्यांना मार्केटात बसायला सांगितले जाते, तर परप्रांतीय लोक मात्र उघडय़ावर बसून विक्री करतात. त्यामुळे मार्केटात बसणाऱया स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय होतो, असे मत परब यांनी व्यक्त केले. शनिवारच्या आठवडय़ाच्या बाजाराच्या दिवशीच मार्केटमधील पहिल्या मजल्यावर व्यवहार चालतो. एरव्ही या मार्केटचा पहिला मजला बंदच असतो. बहुतांश मार्केट संकुल खालीच पडलेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्थानिकांवर अन्याय
या ठिकाणी 15 ते 20 वर्षांपासून व्यवहार करून उपजीविका चालविणाऱयांवर अन्याय केला जातो. नगरपालिकेतील लोक केवळ मतांचे राजकारण करताना स्थानिकांना कमी लेखून परप्रांतांतील विक्रेत्यांना डोक्यावर बसविण्याचे काम करत आहेत. परप्रांतीय विक्रेत्यांकडून ज्या वस्तू विकल्या जातात त्यावर कोणाचेच निर्बंध नाहीत. या परप्रांतियांनी स्थानिक राजकारण्यांना विकत घेतले आहे, असा आरोप करताना परब यांनी, सर्व विक्रेत्यांची व्यवस्थित नोंदणी करावी, अशी मागणी केली.
स्थानिक युवकांना जागा उपलब्ध करा
हे संपूर्ण मार्केट संकुल केवळ शनिवारच्या आठवडय़ाच्या बाजारापुरतेच वापरात न आणता अन्य दिवसांत देखील ते पूर्णपणे वापरात यायला हवे. कोविड-19 मुळे रोजगार गमावलेले स्थानिक युवक आज व्यवसायांच्या शोधात आहेत. त्यांना या मार्केटात कमी भाडे आकारून जागा उपलब्ध करून द्यायला हवी. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे काणकोणमधील कार्यकर्ते यावर नजर ठेवून आहेत, असा इशारा परब यांनी दिला.
पालिकेचे लक्षच नाही की काय ?
या मार्केटातील पहिल्या मजल्यावर ठिकठिकाणी दिसणरे पानाच्या पिचकाऱयांचे डाग आणि अन्य अस्वच्छतेकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. संकुलाची स्वच्छता सांभाळणे गरजेचे असून एकंदर प्रकाराकडे पाहिल्यास काणकोण पालिकेचे या मार्केटाकडे लक्षच नाही की काय असे वाटते, असे मत परब यांनी व्यक्त केले. संपूर्ण मार्केट परिसराची पाहणी करून काही स्थानिक विक्रेत्यांशी त्यांनी चर्चाही केली.