सौंदाळे ग्रामपंचायतीकडून तात्काळ पाण्याची व्यवस्था
‘तरुण भारत’ इफेक्ट
प्रतिनिधी / देवगड:
सौंदाळे येथील कातकरी समाजाला पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत असलेली ‘वणवण’ या बाबत ‘तरुण भारत’ने आवाज उठविल्यानंतर या समाजाला ग्रामपंचायतीच्यावतीने तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली. नळयोजना दुरुस्तीमुळे कातकरी समाजाला पाणी उपलब्ध होत नव्हते. मात्र, आता त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ. सायली मिठबावकर यांनी दिली. शासनाच्या सर्व योजनाचा लाभ ग्रामपंचायत कातकरी समाजाला मिळवून देत असल्याचे त्या म्हणाल्या.
सौंदाळे येथील कातकरी समाजातील चार दिवस पाणी नसल्याने सुमारे दीड कि. मी. अंतरावरून पायपीट करीत पाणी आणत असल्याचे वास्तव ‘तरुण भारत’ने रविवारच्या अंकात मांडले होते. या बाबत तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश गवस, पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर, सरपंच सौ. मिठबावकर व माजी सरपंच आबा तावडे यांनी तात्काळ दखल घेत कातकरी समाजाच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. सौंदाळे गावाला विजयदुर्ग प्रादेशिक नळयोजनेचे पाणी येत असल्याने 5 एप्रिलपासून नळयोजनेच्या दुरुस्तीमुळे पाणी बंद होते. त्यामुळे गावातच पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने कातकरी समाजाच्या वस्तीतही पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करणे शक्य नव्हते. त्यामुळे या समाजाला पाण्यासाठी त्रास सोसावा लागला. आता पाणी सुरळीत सुरू झालेले असून नळयोजनेचे पाणी किमान दोन तास दिले जात आहे. त्यामुळे कातकरी समाजालाचा पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे. कातकरी समाजातील महिलांनी पाणी उपलब्ध झाल्यानंतर सोशल डिस्टन्सी ठेवून पाणी भरले.
नवीन नळकनेक्शन देणार – सौ. मिठबावकर
चार दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळाल्याने कातकरी समाजातील महिला देखील आनंदीत झाल्या. त्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे. सरपंच सौ. मिठबावकर म्हणाल्या, कातकरी समाजाच्या समस्या आम्ही सातत्याने सोडवत आहोत. ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना आणखी नवीन नळकनेक्शन वाढवून देण्यास तयार आहोत. या समाजाला आम्ही कोणतीही वेगळय़ा प्रकारची वागणूक देत नाही, असेही त्या म्हणाल्या.