प्रतिनिधी/ चंद्रकांत देवरुखकर
गतवर्षी एप्रिल महिन्यात भर दिवसा कडक उन्हात 35 ते 38 अंश सेल्सिअस तापमानात रस्त्यावर 12-12 तासांची डय़ुटी करताना वर्दीवरील कापडी बूटांचा त्रास होत होता. याबाबत ’तरुण भारत’ ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यातील वास्तवता पाहून आता उन्हात काम करणाऱया पोलीसांना स्पोर्ट शूज वापरण्याची मुभा दिली होती. मात्र, तीच मुभा पोलीस गृह उपअधिक्षक साळुंखे यांनी ती मुभा काढून घेतल्याने सध्या भर उन्हात वर्दीवरील कातडी बूट पोलीस कर्मचाऱयांसह अधिकाऱयांचाही घाम काढत आहेत.
सातारा पोलीस दलाने कोरोना काळात काही किरकोळ अपवाद वगळता चांगली कामगिरी बजावली आहे. कडक लॉकडाऊन काळात केवळ पोलीस कर्मचारी रस्त्यावर होते. मार्च, एप्रिलचा कडक उन्हाळा होता. त्यातच कोणत्याही सुट्टीविना सलग 12-12 तासांच्या डय़ुटी कर्मचाऱयांनी केल्या. हे करताना त्यांना त्यावेळी त्यांच्या वर्दीवरील कातडी बुटाचा उन्हाळय़ातील गरमीमुळे त्रास होत होता. डय़ुटीवरुन घरी गेल्यानंतर प्रथम थंड पाण्याच्या बादलीत पाय बुडवून बसण्याची वेळ येत होती व यावर्षीही ती स्थिती तशीच आहे. फक्त कडक लॉकडाऊन नाही एवढाच फरक आहे.
सध्या सातारा शहरात वाहतूक शाखेचे कर्मचारी भर कडक उन्हात कातडी बूट घालूनच कर्तव्यावर येत आहेत. तर इतर अनेक ठिकाणी आरोपीला नेण्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात भर उन्हात पोलीस कर्मचाऱयांना या बुटाचा वापर करत असल्याने त्यांना उष्णतेचा त्रास होत आहे. मात्र, कर्तव्य बजावताना शिस्त पाळायची हा एका शिस्तबध्द साळुंखे नावाच्या वरिष्ठ अधिकाऱयांचा आदेश आहे. त्यांनीच सातपुते यांनी दिलेली स्पोर्ट शूजची सवलत काढून घेत पुन्हा कातडी बूट वापरण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, थंडीत हे कातडी बूट वापरण्यास पोलिसांची ना नाही. पावसाळय़ात तर कातडी बूट वापरल्यास त्याची वाटच लागते आणि उन्हाळय़ात तर कातडी बुट सलग अनेक तास वापरल्याने होणारा त्रास कदाचित त्या शिस्तीच्या अधिकाऱयांना माहिती नसावा कारण ते 10-12 तास उन्हात उभे राहून कर्तव्य बजावत नाहीत. शिस्त असलीच पाहिजे मात्र त्या ऋतुनुसार त्या शिस्तीला काम करताना अडचणीही येणार नाही याचे भान ठेवण्याचे गरज आहे.
बंसल साहेब, तुम्ही कर्मचाऱयांना न्याय द्या
सध्या मार्च महिन्यात उन्हाळा कडक तळपत्या लॉकडाऊन नसला तरी आता गर्दीत उभे राहून पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अंगावरील वर्दी अन त्यावरील कातडी बूट पोलीस दादांचा घाम काढत आहेत. भर उन्हात डयुटी केल्यावर घरी गेल्यावर थंड बादलीत पाय बुडवून बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. दिवसभरची तणातणी अन घरी आल्यावर उन्हाळय़ाचा त्रासाने हैराण झालेल्या पोलीस बांधवांची भावना आता एसपी अजयकुमार बंसल यांनी समजावून घ्यावी. कारण कोरोनाचा संसर्ग कमी करुन समाज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे.