राज्यातील सत्तांतराबद्दल आणि अजित पवार यांच्या सोबत स्थापन केलेल्या सरकारचा 80 तासांनी राजीनामा देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काळातील राजकारणाबद्दल योग्य वेळी बेलेन असे वक्तव्य केले होते. आता त्याला सहा महिने उलटून गेले आहेत. त्या सहा महिन्यात या सरकारला तीन चाकी सरकार म्हणण्यापासून विविध पातळय़ांवर अडचणीत आणण्याचे विरोधी पक्षाचे जे काम आहे ते फडणवीस यांनी चोख बजावले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्ये त्यांच्याकडून आणि इतर नेत्यांकडूनही वेळोवळी केली जातात. भाजपच्या कार्यकर्त्यांना यंदाच्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी राज्यात सत्तांतर होईल आणि भाजप सत्तेवर येईल अशी आशा आहे. त्यादृष्टीने ते वेळोवेळी बोलूनही दाखवत असतात. महाविकास आघाडी सरकारपेक्षा आम्ही ही परिस्थिती कशी हाताळली असती याबाबतही विवेचन विविध नेते वारंवार करीत असतात. पण, पत्रकार राजीव परुळेकर यांना अचानकच फडणवीस यांनी मुलाखत देऊन ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 दरम्यान आणि त्यापूर्वीच्या काळात राष्ट्रवादीबरोबर झालेल्या राजकीय चर्चेला जगजाहीर करण्याची ‘योग्य’ वेळ आली आहे असेच सूचित केले आहे. या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती ढवळून निघेल माहिती नाही. मात्र गावोगावच्या पारावर या गोष्टीचा काथ्याकूट नक्कीच सुरू होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यासाठी असलेली सहा महिन्यांची मुदत संपत आली आणि राज्यपाल त्यांच्याबाबतीत सत्ताधाऱयांना हवा तसा निर्णय घेत नाहीत असे लक्षात आल्यानंतर अशाच प्रकारचा काथ्याकूट राज्यात सुरू झाला होता. त्यात फोडणी देण्याचे काम दोन्ही बाजूच्या रथी, महारथींनी केले होते. अर्थात तेव्हाही आणि आताही कोरोनाचे गंभीर संकट असल्यामुळे पारावर एकत्र बसून गप्पा मारायला जागा उपलब्ध नव्हती. परिणामी लोकांनी सोशल मीडिया आणि त्यातही व्हॉटस्ऍप युनिव्हर्सिटीत आपापल्या शोध निबंधांचे रतीब घालण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रात अमूक इतके आमदार बाहेर पडून वेगळा गट स्थापन करतील आणि राजकीय अस्थिरता माजेल इथपासून ते राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करतील इथपर्यंतची चर्चा झाल r. हा फुगा इतका फुगला की, सत्ताधारी पक्षातील मंडळींमध्येही त्यामुळे अस्वस्थता पसरली. या संभाव्य निवडीला काही मंडळींनी न्यायालयात आव्हानही दिले. या याचिकेने अवाक् झालेल्या न्यायालयाने राज्यपालांना आधी मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करायचे किंवा नाही याबाबतचा निर्णय तरी घेऊद्या, तो निर्णय झाल्यानंतर वाटले तर न्यायालयात या असे सांगून याचिका फेटाळण्यात आली, तोपर्यंत गप्प असणाऱया मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांशी चर्चा केली. राज्यपालांनी मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्त असणे संकेताला धरून होणार नाही असे सांगून निवडणूक घेण्याची विनंती वजा पर्याय सुचविला. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी परदेशातून त्याला मान्यता दिली आणि प्रक्रियाही सुरू झाली. दरम्यान एका जादा जागेच्या वादावरून काँग्रेसने आपला एक अधिकचा उमेदवार उभा केला आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला पुन्हा सुनावल्यानंतर आणि काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध पार पडली आणि एक फार मोठी हवा भरलेला फुगा फुटला. त्याचा आवाजसुद्धा आला नाही हे विशेष! आजपासून बरोब्बर एक महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे एकटेच मैदानात उतरले आणि त्यांनी राज्यपालांना भेटून ठाकरे सरकार बरखास्त करावे, यांना कोरोना स्थिती हाताळता येत नाही, निधी कसा खर्च करावा, आर्थिक गणित कसे असावे हे त्यांना कळत नाही, सर्व काही केंद्राच्या पैशावरच सुरू आहे. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी अशी मागणी केली. अर्थात दोनच दिवसात भाजपने या विरोधात वातावरण निर्माण होते आहे हे लक्षात घेऊन ही राणे यांची स्वतःची मागणी आहे त्याचा पक्षाशी संबंध नाही असा खुलासा केला आणि पुन्हा एकदा धुरळा खाली बसला. आता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर अशाच प्रकारचा काथ्याकूट पुन्हा एकदा सुरू होणार आहे. शरद पवार यांचे मोदी यांच्याशी कधी, कधी आणि काय, काय बोलणे झाले होते, शिवसेनेला पर्याय म्हणून ते राज्यातील सत्तेत केव्हा सामील होणार होते, काँग्रेसची साथ सोडायचे विचार त्यांच्या मनात कधीपासून होते याबाबतची बरीच मोठी चर्चा झडू लागेल. पण, त्याचवेळी काही वास्तवांचा विचार केला पाहिजे. तो म्हणजे, पवारांचे आणि काँग्रेसचे नाते हे फार काही सख्ख्याचे आहे अशातला भाग नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांना तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करतानाही पवारांनी शह देऊन सत्तेबाहेर ठेवले आहे. फडणवीस यांनी ‘योग्य वेळ’ समजून वक्तव्य केले असेल तर विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होईपर्यंत या चर्चेत नक्कीच हवा राहील. त्यानिमित्ताने मोठा काथ्याकूट सुरूच राहील. परिणामी राज्यात जितके सत्ताधारी चर्चेत राहतील तेवढाच भाजपही चर्चेत राहील. राज्यात भाजपचे वातावरण राहिले पाहिजे यासाठी केवळ फडणवीस हेच झटत आहेत. त्यांना साथ देणाऱयांमध्ये प्रसाद लाड, प्रवीण दरेकर असे ठरावीकच आमदार आहेत. पक्षाचे उर्वरित आमदार केवळ मजा बघत आहेत. शेतकरी संपाच्यावेळीही या मंडळींनी फडणविसांना वाऱयावर सोडले होते आणि सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून त्यांनी बाजी उलटवली होती. पण, तेव्हा ते सत्तेत हेते आणि आता विरोधात. त्यामुळे पवारांच्या निमित्ताने सुरू झालेला काथ्याकूट काय परिणाम देतो हे पहायचे!
Previous Articleकालची वारी
Next Article 1 जुलैपासून बँकिंग संदर्भातील नियम बदलणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.